Haryana politics : भाजपने भाकरी फिरवली, पाच तासांत बदलला मुख्यमंत्री, कारण...

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

असं काय घडलं की लोकसभा निवडणुकीआधी भाजपला हरयणाचा मुख्यमंत्री बदलावा लागला?
नायब सैनी यांना हरयाणाचे मुख्यमंत्री बनवण्यामागे भाजपची रणनीती काय आहे?
social share
google news

Haryana politics Nayab Singh Saini : हरयाणात फार पूर्वी जे व्हायला हवे होते ते 12 मार्च रोजी घडले! भाजपने जननायक जनता पार्टीचा पाठिंबा गमावला. पण, भाजपचं सरकार कायम राहणार आहे. मग प्रश्न उपस्थित होतो की, भाजप जर दुष्यंत चौटाला शिवाय आज बहुमत सिद्ध करू शकतो तर आधी का नाही केले? यापूर्वीही अपक्ष आमदार भाजपसोबत होते. 

दुसरे असे की, याच निमित्ताने भाजपने मनोहर लाल खट्टर यांच्यापासून सुटकाही करून घेतली आहे. सोमवारी द्वारका एक्सप्रेसवेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी खट्टर यांचे गुणगान गात होते, तेव्हा अनेक राजकीय विश्लेषकांना वाटले की काहीतरी वेगळे घडणार आहे. कारण पंतप्रधान मोदी जाहीरपणे अशी स्तुती करत नाही. 

आता मुद्दा असा आहे की, लोकसभा निवडणूक तोंडावर असताना भाजपला मुख्यमंत्री बदलून काय साध्य करायचं आहे. मात्र, नायब सैनी यांच्या नावाची घोषणा होताच आगामी निवडणुकीत भाजपची रणनीती काय असेल हे स्पष्ट झाले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

'जेजेपी'शी युती तोडण्याची गरज का होती?

हरयाणात जाट विभाजन झाले, तरच भाजपला फायदा होईल, हे सरळ समीकरण आहे. गेल्या निवडणुकीतही भाजपला जाटांची मते मिळाली नव्हती. भाजपही जाटविरोधी मतांसाठी रणनीती आखत आहे. हरयाणात जाट काँग्रेससोबत आहेत. INLD सुद्धा काही मते घेऊ शकते.

जाट मतांसाठी आणखी एक दावेदार आल्यास भाजपचे काम सोपे होईल यात शंका नाही. जेजेपीसोबत राहून भाजपला काही फायदा होणार नव्हता. जेजेपीने भाजपपासून स्वतंत्रपणे निवडणूक लढवली तर पक्षाला अधिक फायदा होऊ शकतो. हे जेजेपीसाठी जेवढे खरे आहे तेवढेच ते भाजपसाठीही आहे.

ADVERTISEMENT

भाजपचा जाट विरोधी मतांवर डोळा

हरयाणाच्या राजकारणावर जाटांचे वर्चस्व आहे. हरयाणात भाजपचे सरकार आल्यापासून मनोहर लाल खट्टर मुख्यमंत्री आहेत. खट्टर हे पंजाबी समुदायातून आलेले आहेत. ही बाब जाटांना सतावत आहे. 2017 मधील जाट आरक्षण आंदोलन याचाच परिणाम होता. 

ADVERTISEMENT

या आंदोलनात पंजाबी आणि सैनींची बरीच जीवित व वित्तहानी झाली. या समुदायांविरोधात जाट जितके आक्रमक होत गेले, तितकी भाजपची जाटविरोधी मते अधिक मजबूत होत गेली. प्रशासकीयदृष्ट्या सक्षम नसतानाही, मनोहर लाल खट्टर यांनी त्यांच्या प्रामाणिकपणामुळे आणि पंजाबी समुदायाशी संबंधित असल्यामुळे एवढ्या मोठ्या कालावधीसाठी मुख्यमंत्री राहण्याची क्षमता सिद्ध केली.

हेही वाचा >> मनसेला पुण्यात मोठा हादरा.. राज ठाकरेंना दंडवत घालून वसंत मोरेंनी सोडली MNS

यामुळेच भाजपने पंजाबी माणसाला राज्याचे मुख्यमंत्री तर केलेच पण जाट ओमप्रकाश धनखड यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवून तिथे नायब सैनी पुढे आणले. नायब सैनी हे मागासलेल्या जातीतील आहेत. मंगळवारी सकाळपासून नायब सैनी यांना मुख्यमंत्री करण्याची चर्चा होती, ती दुपारपर्यंत खरी ठरली. 

नायब सैनी यांना मुख्यमंत्री करून भाजपला राज्यात पंजाबी आणि मागासलेली व्होट बँक आपल्या बाजूला करायची आहे, असे बोलले जात आहे. त्याचा दुसरा फायदा उत्तर प्रदेशच्या निवडणुकीतही होणार आहे.

उपमुख्यमंत्री करून जाटांची नाराजी दूर होईल का?

जाट आरक्षण असो की महिला कुस्तीपटूंचा मुद्दा, हरयाणातील जाटांमध्ये भाजपविरोधात प्रचंड नाराजी आहे. ओमप्रकाश धनखड यांना हरयाणा भाजप अध्यक्षपदावरून हटवल्यानंतर ही नाराजी आणखी वाढली आहे. हरयाणात भाजपला बळकट करण्यासाठी ज्यांनी खूप मेहनत घेतली आहे, त्यात धनखर यांचा समावेश आहे.

धनखडच नाही तर कॅप्टन अभिमन्यू, चौधरी बिरेंद्र सिंग इत्यादींनाही पक्षाने न्याय दिला नाही. हरयाणातील प्रमुख जाट नेते आणि सर छोटू राम यांचे नातू चौधरी वीरेंद्र सिंग आणि त्यांचा मुलगा, माजी आयएएस अधिकारी चौधरी बिजेंद्र सिंग यांना आधी मंत्री करण्यात आले आणि नंतर बाजूला करण्यात आले. चौधरी बिजेंद्र सिंह यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

हेही वाचा >> युती तुटली! भाजपच्या खट्टर यांनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

भाजपतील सर्व बलाढ्य जाट नेत्यांची निराशा झाली आहे. जाट समाजातून आलेले पत्रकार अजय दीप लाथेर म्हणतात की, 'भाजपने जाटांना बाजूला केले असले तरी, हरयाणात भाजपचे व्यवस्थापन इतके मजबूत आहे की पक्ष पुन्हा एकदा 10 पैकी 10 जागा जिंकू शकतो.'

"जाटांची नाराजी रोखण्यासाठी प्रबळ विरोधक नसल्यामुळे हरयाणात पुन्हा एकदा बाजू भाजपकडे झुकताना दिसत आहे. दुष्यंत चौटाला यांची पोकळी भरून काढण्यासाठी भाजप जाट व्यक्तीला उपमुख्यमंत्री बनवू शकते? 

चौटाला घराण्यातील रंजीत सिंह यांना उपमुख्यमंत्री बनवण्याची आशा आहे, असे लाथेर म्हणतात. रणजीत सिंह हे देवीलाल यांचे पुत्र असून त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक जिंकली होती.त्यापूर्वी खट्टर मंत्रिमंडळात ते मंत्रीही होते.

हरयाणातील जातीय समीकरणं काय?

हरयाणाच्या लोकसंख्येमध्ये जाटांची संख्या सुमारे 23 टक्के आहे आणि प्रबळ जात असल्याने जाट राजकीयदृष्ट्याही प्रभावी ठरले आहेत. राज्यातील 90 पैकी किमान 40 विधानसभा जागांवर जाटांचा थेट प्रभाव आहे. 

2014 च्या विधानसभा निवडणुकीत जाटांनी भाजपला एकतर्फी मतदान केले.पण 2019 च्या विधानसभा निवडणुकीत परिस्थिती उलट झाली.जाटांची मते काँग्रेस (30 जागा), जेजेपी (10 जागा) आणि INLD (1) यांच्याकडे गेली.

हेही वाचा >> 'राज ठाकरेंना दोन निरोप पाठवले पण...', वसंत मोरेंनी सांगितलं मनसे सोडायचं खरं कारण!

भाजपचे ज्येष्ठ जाट नेते आणि कॅबिनेट मंत्री कॅप्टन अभिमन्यू आणि ओम प्रकाश धनखड, माजी केंद्रीय मंत्री बीरेंद्र सिंह यांच्या पत्नी प्रेम लता आणि तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला हे सर्वजण निवडणुकीत पराभूत झाले.

राज्यात ब्राह्मण, पंजाबी आणि बनिया समाजाची मते 29 ते 30 टक्के आहेत. त्यांची मते थेट भाजपला जातात. मागासवर्गीयांची सुमारे 24 ते 25 टक्के मतेही भाजपसोबत आल्यास राज्यात विरोधकांना भाजपचा पराभव अशक्य होऊन बसेल.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT