‘मुंबईकरांचं ठरलंय म्हणून काही जणांचं पित्त खवळलंय’; आव्हान देणाऱ्या उद्धव ठाकरेंना भाजपचं उत्तर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आगामी महापालिका निवडणुकीत खरी चुरस शिवसेना विरुद्ध भाजप यांच्यातच असेल हे पुन्हा एकदा दिसून आलं. अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यानंतर उद्धव ठाकरेंनी प्रथमच भाजपवर हल्ला चढवला. वेगवेगळ्या मुद्द्यांवरून ठाकरेंनी भाजपला खडेबोल सुनावले. त्यावर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी लागलीच पलटवार केला.

शिवसेनेतील फुटीनंतर शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा संघर्ष बघायला मिळतोय. त्यातच बुधवारी शिवसेना गतप्रमुखांचा मेळावा मुंबईत पार पडला. या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी थेट मोदी-शाहांना ललकारलं.

राज्यातील सत्तांतरापासून ते मुंबईत महापालिका निवडणुकीपर्यंत विविध मुद्द्यांवरून भाजपला लक्ष्य केलं. त्याचबरोबर शिवसेना आणि शिवसैनिक कसे वेळोवेळी मुंबईकरांसाठी धावून गेले. मुंबई आमच्यासाठी आईसमान आहे आदी उद्गार ठाकरेंनी काढले आणि भाजपला टोले लगावले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरेंचा ‘वार’, भाजपचा पलट’वार’

मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप विरुद्ध शिवसेना यांच्यात राजकीय संघर्ष सुरू झालाय. अमित शाह आणि नरेंद्र मोदींच्या दौऱ्याचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंनी भाजपला डिवचले. त्यानंतर आता आशिष शेलार यांनी ट्विट करत ठाकरेंना लक्ष्य केलंय.

आशिष शेलार उद्धव ठाकरेंना काय म्हणाले?

शेलारांनी ट्विट थ्रेड पोस्ट केलाय ज्यात त्यांनी विविध मुद्दे उपस्थित केलेत आणि ठाकरेंना सवाल केलाय.

ADVERTISEMENT

आशिष शेलार म्हणतात, “26 जुलैच्या पुरात मुंबईकरच मुंबईकरांसाठी झटत होते, हे खरे आहे. पण आज त्या दाहक आठवणींचे भाषण करणारे 26 जुलैच्या पुरात आपल्या वडिलांना मातोश्रीत सोडून स्वत: पंचतारांकित हॉटेलमध्ये जाऊन बसले होते.. त्याचे काय?”, असा सवाल शेलारांनी ठाकरेंना केलाय.

“26/11 च्या हल्ल्यात पण मुंबईकर मुंबईकरांसाठी जातपात, पक्ष न बघता मदत करत होते. नरिमन हाऊस, ताज या परिसरात आमचा कमलाकर दळवीसुद्धा मदत करत होता. आज भाषण करणारे मातोश्रीच्या बाहेर आले होते का?”, असा प्रश्न करत शेलारांनी चिमटा काढलाय.

ADVERTISEMENT

“बॅण्ड स्टँडच्या समुद्रात मुली वाहून जात असताना स्वतःचा जीव धोक्यात घालून मुलींना वाचविताना दुर्दैवी मृत्यू झालेला रमेश वाळूंज हा कार्यकर्ता भाजपाचा होता. जेव्हा त्याने केलेले धाडस चर्चेत आले तेव्हा हा आमचा कार्यकर्ता आहे असे सांगत हे घरी पोहचले”, असंही शेलारांनी म्हटलं आहे.

“कोरोनामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे पीपीई घालून रुग्णालयात जाऊन रुग्णांना धीर देत होते. तेव्हा तुम्ही घरी बसला होतात. स्थलांतरित मजूरांना अन्नधान्य वाटपापासून गरिबांना भाज्या, धान्य वाटणारे शेकडो भाजपाचे कार्यकर्ते तुम्हाला कसे दिसणार?”, असा खोचक सवाल शेलारांनी उद्धव ठाकरेंनी केला.

“तुम्ही घरी बसलात होतात! मुंबईचा ताळेबंद मांडायचा झाला तर बरेच मुद्दे मांडता येतील आणि महापालिकेचा ताळेबंद मांडायचा तर सत्ताधीशांच्या भ्रष्टाचाराचे पारडे जड ठरेल. हिशेब होणारच आहेत सगळ्याचे… ते आम्ही नाही मुंबईकर करणार आहेत. मुंबई जिंकायला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येणार म्हणून तुम्ही ठरवलंत आणि तुम्ही आधीच घाबरून गेलात की काय?”, असा उलट सवाल शेलारांनी ठाकरेंना केलाय.

“अहो, यावेळी मुंबई ही मुंबईकरांना जिंकायची आहे. भाजपा मुंबईकरांसाठी लढणार आहे. मुंबईकरांना बदल हवाय. मुंबईकरांचं ठरलंय! म्हणून काही जणांचं पित्त खवळलंय!!”, असं म्हणत शेलारांनी थेट उद्धव ठाकरेंवर पलटवार केलाय.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT