जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत, सुरक्षा पुरवा आर्यन प्रकरणातील विजय पगारेंची सरकारकडे मागणी
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातले प्रत्यक्षदर्शी विजय पगारे यांनी आता आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत असं म्हटलं आहे. तसंच मला आता सुरक्षा पुरवण्यात आली पाहिजे. सरकारने मला सुरक्षा पुरवावी असंही म्हटलं आहे. NCB ने आर्यन खानवर केलेल्या कारवाईत आता प्रत्येक दिवशी नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात आता विजय पगारे नावाचा एक साक्षीदार शनिवारी […]
ADVERTISEMENT

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातले प्रत्यक्षदर्शी विजय पगारे यांनी आता आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत असं म्हटलं आहे. तसंच मला आता सुरक्षा पुरवण्यात आली पाहिजे. सरकारने मला सुरक्षा पुरवावी असंही म्हटलं आहे.
NCB ने आर्यन खानवर केलेल्या कारवाईत आता प्रत्येक दिवशी नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात आता विजय पगारे नावाचा एक साक्षीदार शनिवारी माध्यमांसमोर आला असून त्याने मुंबई पोलिसांच्या SIT समोर महत्वाचा जबाब नोंदवला आहे. क्रुझवर छापेमारी करुन आर्यन खानला त्यात अडकवून पैसे वसूल करण्याची योजना आखण्यात आली होती असा धक्कादायक दावा विजय पगारे यांनी केला आहे.
क्रुझवर छापेमारी करण्याआधी मनिष भानुशाली, सॅम डिसूझा, के.पी. गोसावी आणि सुनील पाटील यांच्यात अनेकदा मिटींग झाल्याचीही माहिती पगारे यांनी दिली आहे. भाजप नेते मोहीत कंबोज यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सुनील पाटील यांच्या नावाचा गौप्यस्फोट करत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असल्याचा आरोप केला होता.
पगारे हे मुळचे धुळ्याचे रहिवासी असून ते गेल्या काही महिन्यांपासून सुनील पाटील यांच्यासोबत राहत होते. पगारे यांनी पाटील यांना काही कारणासाठी पैसे दिले होते, हे पैसे वसूल करण्यासाठी ते सातत्याने पाटील यांच्या मागे लागले होते. वारंवार विनंती करुनही सुनील पाटील पैसे परत करण्यासाठी मुदतवाढ घेऊन टाळाटाळ करत असल्यामुळे पगारे यांनी सुनील पाटील यांच्यासोबत राहण्यास सुरुवात केली. सुनील पाटील यांच्यासोबत मी अहमदाबाद, सूरत आणि मुंबईत असल्याची माहिती पगारे यांनी इंडिया टुडेशी बोलताना दिली. द ललित आणि नवी मुंबईतील फॉर्च्युन हॉटेलमध्ये आपण राहत होतो असेही पगारे यांनी सांगितलं होतं.
दरम्यान आता आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहे आणि सरकारने आपल्याला आता सुरक्षा पुरवावी अशी मागणी पगारे यांनी केली आहे. पगारे यांना कोण धमक्य देतं आहे याचा शोध पोलीस घेणार का आणि त्यांना सुरक्षा पुरवणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.