
Year Ender 2022: मुंबई: सर्वांनाच आता नव्या वर्षाची उत्सुकता लागून राहिलेली आहे. संपूर्ण जग नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आतूर झालं आहेत. 2022 हे वर्ष प्रत्येकासाठी वेगवेगळे अनुभव देणारे ठरले. कोणासाठी आनंददायी तर, कोणासाठी दुख:द ठरले. गेल्या वर्षभरावर नजर टाकली तर अशा अनेक घटना या काळात घडल्या, ज्याचा संपूर्ण देशावर मोठा परिणाम झाला. सोशल मीडियापासून इतर ठिकाणी या घटनांची जोरदार चर्चा झाली. 2022 हे वर्ष नेमकं कसं सरलं हे आता आपण काही घटनांमधून पाहूयात.
5 जानेवारी 2022 रोजी म्हणजे या वर्षाच्या सुरुवातीलाच एक मोठी घटना घडली. एका कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंजाबमध्ये पोहोचले होते. याचवेळी त्यांचा ताफा जात असताना एका उड्डाणपुलावर तो ताफा अचानक अडकला. हा उड्डाणपूल पाकिस्तान सीमेपासून फक्त 20 किलोमीटर अंतरावर होता. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत चूक झाल्याचं आढळून आलं. ज्यावरुन प्रचंड गदारोळ झाला होता.
भारतरत्न आणि गानकोकिळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांचे या वर्षी निधन झाले. वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मल्टिपल ऑर्गन डिसफंक्शन सिंड्रोम या आजाराशी त्या झुंज देत होत्या. पण 6 फेब्रुवारी 2022 रोजी त्यांचं निधन झालं. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील बप्पी लाहिरी, राजू श्रीवास्तव, बिरजू महाराज यांचे निधन झाले. तर उद्योग क्षेत्रातील राहुल बजाज, सायरस मिस्त्री यांच्यासह अनेकांचेही या वर्षी निधन झाले.
हिजाब विवाद 2021 मध्ये सुरु झालेला आणि 2022 मध्येही तो चर्चेत राहिला. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायमूर्तींचे मत वेगळे राहिल्याने हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे पाठवण्यात आले.
केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेबाबत देशभरात मोठा गदारोळ झाला होता. या योजनेचा निषेध करण्यात आला होता. भारतीय सैन्यात तरुणांचा समावेश करण्यासाठी अग्निपथ योजना सुरू करण्यात आली आहे. ही एक सरकारी योजना आहे, ज्या अंतर्गत अग्निवीर पदासाठी अर्जदारांची भरती केली जाईल. या योजनेंतर्गत केवळ भारतीय लष्करातच नव्हे तर हवाई दल आणि भारतीय नौदलातही भरती केली जाईल.
एका टीव्ही कार्यक्रमादरम्यान भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केली होती. त्यानंतर देशातील अनेक भागात हिंसाचार झाला. याशिवाय नुपूर शर्माला पाठिंबा दिल्याने काही जणांची हत्याही झाली होती.
याच वर्षी मार्चमध्ये प्रदर्शित झालेल्या 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाला प्रोपगंडा चित्रपट म्हटले गेले. मात्र, असे असतानाही लोकांनी या चित्रपटाला भरभरून प्रेम दिले. 15 ते 20 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 252 कोटींचा व्यवसाय केला.
या वर्षी मे महिन्यात पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या घटनेची चर्चा ही केवळ भारतातच नव्हे तर जगभरात झाली.
2022 मध्ये महाराष्ट्रात एक प्रचंड मोठी घडामोड पाहायला मिळाली. कारण महाविकास आघाडीची अडीच वर्ष असलेली सत्ता एकनाथ शिंदे यांनी उलटवली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 40 आमदारांसह बंड पुकारला. यामुळे शिवसेना पक्षात फूट पडली आणि शिंदेनी भाजपसोबत सरकार स्थापन करत थेट मुख्यमंत्री पद पटकावलं.
आफताब पूनावाला याने त्याची लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकरचा गळा दाबून खून केला आणि तिच्या शरीराचे 35 तुकडे केले. यानंतर ते तुकडे अनेक दिवस फ्रीजमध्ये ठेवण्यात आले आणि हळूहळू ते जवळच्या जंगलात टाकण्यात आले. दिल्ली पोलिसांनी नुकतेच आफताबला अटक केली. हे प्रकरण देखील अवघ्या देशभरात बरंच गाजलं. ज्यावरुन लव्ह जिहादची चर्चा देखील बरीच रंगली.
2022 मध्ये उत्तर प्रदेश, गुजरात, उत्तराखंड, गोवा, मणिपूरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने बाजी मारली, तर पंजाबमध्ये आम आदमी पार्टी आणि हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने बाजी मारली.