मुंबईची खबर : मध्य रेल्वेवर तीन दिवस विशेष ब्लॉक, नेमकं कारण काय? पहा बदललेले वेळापत्रक
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागांतर्गत विद्याविहार स्थानकावर पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षिततेच्या कामासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुंबईची खबर : मध्य रेल्वेवर तीन दिवस स्पेशल ब्लॉक
नेमकं कारण काय?
पहा बदललेले वेळापत्रक
Mumbai Local Special Block : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागांतर्गत विद्याविहार स्थानकावर पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षिततेच्या कामासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक 15 मे ते 18 मे 2026 या कालावधीत एकूण तीन रात्री चालणार असून, याचा परिणाम प्रामुख्याने मेन लाईनवरील उपनगरीय रेल्वे सेवांवर होणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हे काम अत्यंत आवश्यक असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
काही गाड्या पूर्णत: रद्द
ब्लॉकच्या वेळापत्रकानुसार, पहिली रात्र 15-16 मे रोजी पहाटे 1.15 ते 4.15 वाजेपर्यंत, दुसरी रात्र 16-17 मे रोजी मध्यरात्री 00.10 ते पहाटे 4.40 वाजेपर्यंत आणि तिसरी रात्र 17-18 मे रोजी पहाटे 1.15 ते 03.05 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. हा ब्लॉक कुर्ला ते भांडुप दरम्यानच्या अप आणि डाऊन धीम्या व जलद मार्गांवर, तसेच पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर टप्प्याटप्प्याने घेतला जाईल. यामुळे काही लोकल गाड्यांच्या मार्गांत बदल करण्यात आला असून, काही गाड्या पूर्णतः रद्द करण्यात आल्या आहेत.
हे ही वाचा : Govt Jobs : इंजिनिअरिंग, MSc उत्तीर्ण उमेदवारांना इंडियन आर्मीत मोठी संधी, वर्षाला 17-18 लाख CTC
असा आहे बदल
या ब्लॉकमुळे अनेक लोकल गाड्यांच्या वेळापत्रकात मोठे बदल झाले आहेत. ठाणे-कुर्ला, ठाणे-सीएसएमटी आणि सीएसएमटी-ठाणे या दरम्यान सुटणाऱ्या रात्रीच्या आणि पहाटेच्या काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच, सीएसएमटीहून ठाण्यासाठी सुटणाऱ्या काही एसी लोकल कुर्ला स्थानकापर्यंतच चालवल्या जातील, तर डोंबिवली-सीएसएमटी लोकल ठाणे स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट केली जाईल. याशिवाय, विद्याविहार येथून सुटणारी कुर्ला-टिटवाळा लोकल ठाणे येथून, तर ठाणे येथून सुटणारी सीएसएमटी लोकल कुर्ला येथून मार्गस्थ होईल.
हे ही वाचा : सरन्यायाधीशांनी ठाकरेंच्या वकिलांना फटकारलं, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
शेवटच्या क्षणी होऊ शकतात बदल
ब्लॉक कालावधीत धावणाऱ्या काही डाऊन धीम्या सेवा माटुंगा आणि मुलुंड दरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. महत्त्वाचे म्हणजे, या वळवण्यात आलेल्या गाड्या विद्याविहार, कांजूरमार्ग आणि नाहूर या स्थानकांवर थांबणार नाहीत. मात्र, 16-17 मे आणि 17-18 मे रोजी धावणाऱ्या मेल-एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे. कामाच्या निकडीनुसार काही गाड्यांच्या मार्गात शेवटच्या क्षणी बदल होऊ शकतात, तरी प्रवाशांनी होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.









