
मुंबई: कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी गेले 15 दिवस सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा आज (10 एप्रिल) सायंकाळी 5 वाजता थंडावल्या. या निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइन सभा घेतली. याच सभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की, 'शिवसैनिक काँग्रेसला मत देणारच.. दिलेला शब्द पाळणारच' असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
शिवसेनेने हिंदुत्व सोडलं असून आता ते काँग्रेसच्या नादी लागले आहेत अशी टीका त्यांच्यावर सातत्याने भाजप नेत्यांकडून सुरु असते. याच टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, 'शिवसैनिक हे काँग्रसेला मतदान करणारच.. कारण आम्ही दिलेला शब्द पाळतो'
उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
'2014 ला युती तोडताना काय म्हणून तुम्ही युती तोडली होती? आम्ही नव्हती युती तोडली. अगदी अर्ज भरायच्या एक दिवस आधी मला खडसेंचा फोन आला आणि मला म्हणाले की, 'उद्धवजी आपलं काही जुळेल असं वाटत नाही आपण स्वतंत्र लढलेलं बरं.' मी त्यादिवशी तुळजाभवानीच्या दर्शनाला गेलो होतो. कारण आपल्या युतीच्या बोलण्यामध्ये एक समझोता होत आला होता. जागा वाटप होत आलं होतं. पण अचानक असं काय अक्रित घडलं होतं की, त्याही वेळेला आमच्या हातात भगवा होताच.. तेव्हा आम्ही तेच होतो जे आजही आहोत. पण युती तोडली आणि स्वतंत्र लढलात.'
'2014 कोल्हापूरच्या मतदारसंघात 40 हजार मतं पडली होती. 2019 ला पुन्हा एकदा भाजपने आपल्याशी युती केली होती. तेव्हा इथं आपल्याला अधिक मतं मिळायला हवी होती. पण भाजपच्या या मतांपैकी फक्त 5-6 हजारं मतं मिळाली. उरलेली मतं गेली कुठे?'
'आज आपण जयश्री ताईंचा प्रचार करतो आहोत. त्या आपल्या उमेदवार आहेत आणि त्या निवडून येणार हे नक्की आहेच. कारण शिवसेना हा समोरुन वार करतो. पाठीत वार करत नाही. आम्ही होय तर होय म्हणतो.. आणि एकदा का होय म्हटलं की, खरं करुन दाखविण्यासाठी वाट्टेल ते करु.'
'2019 च्या निवडणुकीत इथे शिवसेनेचा पराभव झाला. भाजपची 40 हजार शिवसेनेला मिळाली असती तर 1 लाख 10 हजार मतं शिवसेनेला मिळाली असती. 2014 मध्ये काँग्रेसची जी मतं 47 हजार होती ती 91 हजार झाली. मग ही 40 हजार मतं तुम्ही फिरवली नाहीत कशावरुन?'
'आज म्हणे शिवसैनिक काँग्रेसला मत देणार का? हो देणारच.. गेल्या वेळी तुम्ही छुपं मत दिलं होतंत की नाही. याचा खुलासा कोण करणार? तुम्ही छुपं काम करता.. आम्ही देशाच्या राज्याच्या आणि कोल्हापूरच्या हितासाठी उघडपणे करतो. पाठिंबा देतो तो उघडपणाने देतो. विरोध करतो तो सुद्धा उघडपणाने. हे लपूनछपून करणारी जातकुळी आमची नाही.'
'आमच्यावर जी टीका करता तुम्ही काँग्रेससोबत तुम्ही गेलात शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार का? होय करणार.. कारण आम्ही नाटक नाही करत.. पण काँग्रेससोबत जाणं हे पाप असेल तर मेहबुबा मुफ्तीसोबत सरकारमध्ये जे बसला होतात ते काय पुण्य होतं तुमचं? मेहबुबा मुफ्ती काय वंदे मातरम, भारतमाता की जय म्हणत होत्या? पण सत्तेसाठी तुम्ही त्यांच्यासोबत गेलात. तिथेच तुमचं हिंदुत्व वैगरे भ्रष्ट झालं.' अशी घणाघाती टीका यावेळेस उद्धव ठाकरेंनी केली आहे.