दंगलीनंतर अमरावतीत बंधुभावाचे रंग, मुस्लीम व्यक्तींचा देवळासाठी पहारा…हिंदूंची दर्ग्यात गस्त

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

– धनंजय साबळे, अमरावती प्रतिनीधी

त्रिपुरातील मशिदीच्या कथित विटंबनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. अमरावती शहरात दोन दिवस झालेल्या दंगलीमुळे सरकारी मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. दंगलीत काही असामाजिक तत्वांनी मंदिर आणि मशिदीलाही आपलं लक्ष्य केलं. यानंतर पोलिसांनी शहरात कलम १४४ लागू करुन संचारबंदी घोषित केली.

सध्या शहरात तणावपूर्ण शांतता असली तरीही काही सुज्ञ हिंदू-मुस्लीम बांधवांनी आपल्या कृतीमधून सर्वधर्म समभावाचं उदाहरण घालून दिलंय.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अमरावतीच्या हबीब नगर परिसरातील मुस्लीम बांधवांनी आपल्या भागातील शंकराच्या मंदीराबाहेर पहारा घालायला सुरुवात केली असून हिंदू लोकं दर्ग्यात गस्त घालत आहेत. संचारबंदीमध्ये आपल्या विभागातलं सामाजिक सलोख्याचं वातावरण कोणीही बिघडवू नये यासाठी ही लोकं जिवापाड मेहनत घेत आहेत. वळगाव रोड परिसरात हिंदू लोकसंख्या अत्यंत कमी आहे. परंतू दंगलीदरम्यान काही लोकांनी या भागातील देवळाला लक्ष्य करुन वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला.

परंतू यावेळी तिकडे उपस्थित मुस्लीम व्यक्तींनी मंदिराचं संरक्षण करुन कोणताही अनुचित प्रसंग होऊ दिला नाही. याबद्दल स्थानिक रहिवासी अमजद अली यांनी माहिती दिली. “नुकताच आमचा मोर्चा पार पडला, तो मोर्चा पूर्णपणे शांततेत पार पडला. परंतू या मोर्चात काही असामाजिक तत्व सहभागी झाले आणि त्यांनी याला धार्मिक रंग दिला. हीच लोकं दोन्ही समाजात तेढ निर्माण करतात, पण याचा फटका नेहमी गुण्या-गोविंदाने राहणाऱ्या लोकांना बसतो. आम्हाला हे अजिबात मान्य नाही, म्हणूनच आम्ही सर्वांनी मंदिराबाहेर पहाऱ्यासाठी बसण्याचं ठरवलं.”

ADVERTISEMENT

निर्जन रस्ते, भयाण शांतता…पाहा दंगलीनंतरच अमरावती शहर

ADVERTISEMENT

दुसरीकडे या भागातील हिंदू लोकांनीही आपली भूमिका बजावत दर्ग्यामध्ये गस्त घालत आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या अमरावतीत धर्माच्या आधारावर हा भेदभाव होऊ देणार नाही अशी भूमिका येथील स्थानिक हिंदू व्यक्तींनी घेतली आहे.

अमरावतीच्या हबीब नगर आणि झाकीर कॉलनी परिसरात हिंदूंची ५-६ मंदीर आहेत. मुस्लीमबहुल परिसर असूनही येथील स्थानिक लोकांनी सामाजिक सलोख्याची महाराष्ट्राची परंपरा कायम राखत मंदिराचं रक्षण करण्याचा निर्णय घेतला. आम्ही या भागात गेली अनेक वर्ष राहत आहोत. याआधीही अमरावती शहरात अनेकदा धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. परंतू आमच्या सलोख्यामुळे या भागात आम्हाला नेहमी सुरक्षीत वाटत आल्याची भूमिका स्थानिक नागरिक सतीश जावकर यांनी मांडली.

महाराष्ट्राला उदार आणि थोर मतवादी विचाराच्या समाजसुधारकांची मोठी पार्श्वभूमी आहे. अनेकांनी या राज्यात जात-पात, धर्माच्या भिंती मोडून माणूस म्हणून माणसाकडे पहायला हवं अशी शिकवण दिली. अमरावतीच्या लोकांनी याच शिकवणीचा धडा आपल्या आयुष्यात गिरवत महाराष्ट्र हा इतर राज्यांपेक्षा वेगळा का आहे याचं उदाहरण घालून दिलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT