
Sharad Pawar On Raut Vs Rane : राज्यात सध्या दोन आजी-माजी शिवसैनिकांमधील (Sanjay Raut-Narayan Rane) राजकीय वाद शिगेला गेलाय. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी (Union Minister Narayan Rane) खासदार संजय राऊतांना (MP Sanjay Raut) तुरुंगात पाठवण्याचा इशारा दिला. त्यानंतर जोरदार शाब्दिक युद्ध (Political war) सुरु झालंय. या वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष (NCP President) शरद पवार (Sharad Pawar) यांनी भूमिका मांडली. यावेळी शरद पवारांनी राणेंचा उल्लेख न करता अप्रत्यक्षपणे फटकारलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कोल्हापुर दौऱ्यावर आहेत. रविवारी (8 जानेवारी) शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना नारायण राणे आणि संजय राऊत यांच्यात सुरू असलेल्या राजकीय वादाबद्दल प्रश्न विचारण्यात आला.
यावर बोलताना शरद पवार म्हणाले, "असं आहे की, सत्ता हातात असल्याच्या नंतर जमिनीला पाय ठेवून वागायचं असतं. पण, मी अलिकडे पाहतो की, सरकार ज्यांच्या हातात आहे, त्यांची अशा प्रकारची विधानं की, यांना तुरुंगात घालीन, यांचा जामीन रद्द करेन वगैरे वगैरे. हे काही राजकीय नेत्यांचं काम नाहीये. यात टोकाला जाण्याची भूमिका काही लोकांनी घेतलीये. ठिक आहे."
'विरोधकांकडून शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उल्लेख शिल्लक सेना उल्लेख असा केला जातोय आणि त्यात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेच राहतील असं म्हटलं जात आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या राजकीय भवितव्याबद्दल काय वाटतं?', असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला.
यावर उत्तर देताना शरद पवारांनी शिंदे गटातील नेत्यांनाही सूचक इशारा दिला. पवार म्हणाले, "तुम्ही जे सांगितलं ते कुणाचं मत आहे? मी महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात गेलोय, जातोय. अगदी कोल्हापूर. माझ माहिती अशी आहे की, शिवसेनेत गट पडले ही गोष्ट खरी आहे; पण शिवसैनिक जो कडवा कार्यकर्ता आहे. जमिनीवर काम करणारा, हा बहुसंख्य उद्धव ठाकरेंच्या बरोबर आहे. याला कोल्हापूर सुद्धा अपवाद नाहीये. कदाचित काही आमदार, नेते, खासदार इकडून तिकडे गेले असतील, पण उद्या निवडणुका होईल, त्यावेळी जनतेच्या भावना काय आहेत, हे त्यांच्या लक्षात येईल."
राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी 'राज्यपाल झाल्यापासून मी खुश नाहीये. मी योग्य ठिकाणी नाहीये', असं विधान केलं. यावर शरद पवारांनी मिश्कील टोला लगावला.
पवार म्हणाले, "ते नाखुश असतील, तर आम्हीही सगळे नाखुश आहोत. महाराष्ट्रात अनेक चांगले राज्यपाल आम्ही पाहिले आहेत. अनेक नावं घेता येतील. जे राज्यपाल महाराष्ट्रात झाले, त्यांनी पक्ष कुठलाही असो, महाराष्ट्राच्या हिताचा मार्गदर्शन करणं आणि घटना अबाधित राहिल असं काम केलं."
पुढे बोलताना पवार म्हणाले, "हे (भगतसिंह कोश्यारी) पहिले राज्यपाल आहे, ज्यांच्याबद्दल टीका होतेय. लोकांना त्यांच्यावर टीका करावी लागतेय. चुकीची विधानं करतात. त्यामुळे जनतेला त्याबद्दलची नापसंती दाखवून द्यावी लागते. हे चांगलं नाही. शेवटी त्या पदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे, पण ती यांच्याकडून राखली जात नाहीये."