अमृता फडणवीसांची माफी मागितलेले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष 6 तालुकाध्यक्षांसह शिंदे गटात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष आणि माजी उपमहापौर अशोक गावडे यांनी गुरुवारी शिंदे गटात प्रवेश केला. मागील अनेक दिवसांपासून ते शिंदे गटात जातील अशा चर्चा होत्या. अखेरीस त्यांनी नंदनवन बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर आता शिवसेनेतून आलेल्या नामदेव भगत यांच्यावर राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

गावडेंसह त्यांच्या पत्नी आणि माजी नगरसेविका निर्मला गावडे, मुलगी आणि माजी नगरसेविका सपना गावडे, सानपाड्याचे तालुकाध्यक्ष रवींद्र ढोबळे, कोपरखैरणेचे तालुकाध्यक्ष मोहन पाडळे, घणसोलीचे तालुकाध्यक्ष हेमंत पाटील, सीबीडी बेलापूरचे तालुकाध्यक्ष अरुण कांबळे, रबाळेचे तालुकाध्यक्ष महेश बिराजदार, तुर्भेचे तालुकाध्यक्ष नियाज शेख आणि अनेक पदाधिकाऱ्यांनीही शिंदे गटात प्रवेश केला.

गावडे आणि पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश हा राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. माजी मंत्री आणि आमदार गणेश नाईक यांनी सर्व नगरसेवकांसहित भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची नवी मुंबईमधील सारी सूत्र गावडेंकडे सोपविण्यात आली होती. गावडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांचे निकटवर्तीय मानले जात होते. त्यामुळेच पवार यांनी गावडेंकडे सूत्र दिल्याचे बोलले जात होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

त्यानंतर लगेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनात गावडे यांना ताकद देण्याचे काम करण्यात आले होते. तसेच त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांच्याविरोधात उतरविण्यात आले होते. पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवूनही गावडे यांनी म्हात्रे यांना विजयासाठी संघर्ष करायला लावला होता.

गावडे आणि वाद

अशोक गावडे आणि वाद हे समीकरण जुने आहे. सोसायटीच्या पुनर्बांधणीच्या मुद्द्यावरुन त्यांच्यावर मारहाण आणि दादागिरी असे गुन्हे दाखल आहेत. या विरोधामुळे त्यांचा सोसायटीची पुनर्बांधणीही रखडली आहे. याशिवाय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल अक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गावडे यांनी माफीही मागावी लागली होती. मी त्यांना किंवा कोणत्याही महिलेला लक्ष्य करत नव्हतो. मी सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल बोलत होतो. असे म्हणतं त्यांनी दिलगीरी व्यक्त केली होती.

ADVERTISEMENT

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, नवी मुंबई शहर हे अतिशय सुंदर आणि सुनियोजित शहर आहे. मात्र तरीही या शहरात अनेक नागरी आणि पुनर्विकासाचे प्रश्न प्रलंबित आहेत. मी स्वतः नवी मुंबईतील नागरिकांना दिलासा देण्यासाठी नगरविकास मंत्री असताना अनेक निर्णय घेतले असून त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना झालेला आहे. यापुढेही नवी मुंबईतील विकासकामे प्राधान्याने पूर्ण करून नागरिकांना न्याय देऊ असेही त्यांनी सांगितले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT