केंद्रीय यंत्रणांच्या कारवाया वाढणार?; पंतप्रधान मोदींनी लालकिल्ल्यावरून कुणाला दिला इशारा?
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसह पाच राज्यांचे निकाल लागल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ईडीच्या कारवायांवर शंका उपस्थित करणाऱ्या विरोधकांना उत्तर दिलं होतं. त्यानंतर स्वातंत्र्यदिनी लालकिल्ल्यावरून केलेल्या भाषणात मोदींनी पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचा उल्लेख करत विरोधकांवर शरसंधान साधलंय. महाराष्ट्र, पश्चिम बंगालसह विविध राज्यांत झालेल्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर मोदींनी हे विधान केलं असून, त्याचा अर्थ केंद्रीय यंत्रणाच्या कारवाया वाढणार, अशी चर्चा […]
ADVERTISEMENT

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसह पाच राज्यांचे निकाल लागल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ईडीच्या कारवायांवर शंका उपस्थित करणाऱ्या विरोधकांना उत्तर दिलं होतं. त्यानंतर स्वातंत्र्यदिनी लालकिल्ल्यावरून केलेल्या भाषणात मोदींनी पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचा उल्लेख करत विरोधकांवर शरसंधान साधलंय. महाराष्ट्र, पश्चिम बंगालसह विविध राज्यांत झालेल्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर मोदींनी हे विधान केलं असून, त्याचा अर्थ केंद्रीय यंत्रणाच्या कारवाया वाढणार, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचाराबद्दल काय म्हणाले?
“काही विषयावर मी आज चर्चा करू इच्छितो. चर्चा अनेक विषयांवर होऊ शकते, पण वेळेच्या मर्यादेअभावी मी दोन विषयांवर बोलू इच्छितो. एक आहे भ्रष्ट्राचार. दुसरा घराणेशाही. लोक गरिबीशी संघर्ष करत आहेत. एकीकडे लोकांना राहण्यासाठी घर नाही, दुसरीकडे असे लोक आहेत ज्यांना चोरीचा पैसा ठेवायला जागा नाही. हे चांगलं नाही.”
“आपल्याला भ्रष्टाचाराविरोधात पूर्ण ताकदीशी लढायचं आहे. मागील आठ वर्षात थेट अनुदानाद्वारे, आधार, मोबाईल, या आधुनिक यंत्रणांचा वापर करून जे करोडो रुपये चुकीच्या हातात जात होते, ते वाचवून देशाच्या भल्यासाठी वापरण्यात आम्ही यशस्वी झालोय”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले.
तुरूंगात जायला भाग पडेल, अशी स्थिती आम्ही निर्माण करतोय- पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात म्हणाले, “जे लोक मागील सरकारांच्या काळात बँका लुटून पळून गेले, त्यांच्या मालमत्ता जप्त करून त्यांना परत आणण्याचे प्रयत्न करत आहोत. अनेकांना तुरुंगात जगण्यासाठी आम्ही भाग पाडलंय. ज्यांनी देशाला लुटलं, त्यांनी सगळं परत करावं, अशी परिस्थिती आम्ही निर्माण करत आहोत.”