
रस्ते सुरक्षा या विषयावर नितीन गडकरी यांचं वक्तव्य समोर आलं आहे. तसंच त्यांनी वाढत्या अपघातांबाबत चिंता व्यक्त केली आहे. नितीन गडकरी यांनी कारमध्ये असणाऱ्या सेफ्टी फिचर्सबाबतही वक्तव्य केलं. भारतात सहा एअरबॅगवाल्या कार आम्ही आणतो आहोत असं नितीन गडकरींनी म्हटलं आहे. तसंच सीट बेल्ट न लावणंही चुकीचं आहे असंही गडकरींनी म्हटलं आहे. इंडिया टुडेच्या विशेष कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
इंडिया टुडेशी चर्चा करताना नितीन गडकरींना सायरस मिस्त्रींच्या अपघाती निधनाबाबत प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी नितीन गडकरी म्हणाले, अहमदाबाद-मुंबई हायवे खूप भयानक आहे. तिथे ट्रॅफिक PCU १.२० लाख आहे हे प्रमाण घटवून आम्हाला २० हजार PCU पर्यंत आम्हाला कमी करायचं आहे असंही नितीन गडकरींनी म्हटलं आहे. २०२४ पर्यंत सरकार रस्ते अपघातांचं प्रमाण ५० टक्क्यांनी कमी करण्याचं उद्दीष्ट समोर ठेवतं आहे. रस्ते अपघात कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मानदंड आहेत ते पाळले जातील असंही नितीन गडकरींनी स्पष्ट केलं.
भारतात कारमध्ये मागच्या सीटवर बसणारे लोक अजिबात सीट बेल्ट लावत नाहीत. सायरस मिस्त्री यांचा मृत्यू झाल्यानंतरही या गोष्टी बोलल्या जात आहेत. याबाबत विचारलं असता नितीन गडकरी म्हणाले की, सीटबेल्ट हा जेवढा पुढे बसणाऱ्या लोकांसाठी आवश्यक आहे तेवढाच कारमध्ये मागे बसलेल्या लोकांसाठीही आहे. याबाबत गडकरींनी एक किस्सा सांगितला. ते म्हणाले मी काही दिवसांपूर्वी चार मुख्यमंत्र्यांच्या कारमध्ये बसलो होतो. त्यांच्या सगळ्यांच्या कारमध्ये फ्रंट सीटवर बसताना सीट बेल्ट लावला जातो त्या जागी एक क्लिप लावलेली होती. इशारा देणारा अलार्म वाजू नये म्हणून ही खास व्यवस्था केली गेली होती. त्यावेळी मी ड्रायव्हरला रागावलो आणि त्या क्लिप हटवल्या असंही नितीन गडकरींनी स्पष्ट केलं.
नितीन गडकरींनी यावेळी त्यांच्या तरूणपणातला किस्साही सांगितला. तरूणपणी आम्ही पण नियम मोडायचो. एका स्कूटरवर चार चार जण फिरायचो. तेव्हा हे कळत नव्हतं की असं करणं किती धोकादायक आहे. त्या काळी आम्ही निवडणूक प्रचार करायला चौघं जण एका स्कूटरवर फिरायचो आणि दंड भरावा लागू नये म्हणून स्कूटरची नंबरप्लेट काढून हातात घेत असू. मात्र हे करणं चुकीचं आहे. लोकांना त्यांची मानसिकता बदलावी लागेल, नियम पाळावे लागतील असंही नितीन गडकरींनी म्हटलं आहे.