फॉक्सकॉनपाठोपाठ आता PhonePe महाराष्ट्रातून बाहेर पडणार, शिंदे-फडणवीस सरकारवर पुन्हा टीकास्त्र

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

फॉक्सकॉन वेदांताचा सेमीकंडक्टरचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने राजकारण चांगलंच तापलं होतं. महाविकास आघाडीचे नेते हे शिंदे-फडणवीस सरकारवर तुटून पडले होते. तर शिंदे फडणवीस सरकारनेही आम्ही कसे निकराचे प्रयत्न केले पण महाविकास आघाडीमुळेच हा प्रकल्प राज्याबाहेर गेला हेदेखील सांगितलं. आता हे सगळं प्रकरण शांत होत नाही तोच फोन पे (PhonePe) या कंपनीनेही आपलं कार्यालय महाराष्ट्रातून बाहेर नेण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांनी यावरून शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली आहे.

मुंबईतलं फोन पे चं कार्यालय कर्नाटकात स्थलांतरित होणार

फोन पे ने मुंबईतलं कार्यालय बंगळुरुला नेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारसाठी धक्का मानला जातो आहे. फोन पे कार्यालय का बाहेर नेणार आहे? हे कारण समजू शकलेलं नाही. मात्र आता यावरून पुन्हा एकदा राजकारण सुरू झालं आहे. डिजिटल पेमेंटमध्ये फोनपे ही कंपनी अग्रस्थानी आहे. त्यांनी त्यांचं मुंबईतलं कार्यालय कर्नाटकमध्ये नेण्याचा निर्णय़ घेतला आहे. एका वृत्तपत्रात ही माहिती छापून आली आहे. जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार या दोघांनीही ही माहिती ट्विट करत शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.

काय आहे जितेंद्र आव्हाड यांचं ट्विट?

आजच्या वर्तमानपत्रातील ही नोटीस आहे..वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प गुजरात मध्ये गेला आणि त्यापाठोपाठ फोन पे चे मुख्य ऑफिस देखील कर्नाटकात जाण्याच्या वाटेवर..काय चाललंय काय ? महाराष्ट्रातली बेरोजगारी संपली कि काय ? जाहिरातीत आक्षेप असल्यास नोंदवा असे जाहीर केले आहे आक्षेप नोंदवा …. असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

काय आहे रोहित पवारांचं ट्विट?

वेदांतानंतर #PhonePe ची बारी गब्बर होतायेत शेजारी महाराष्ट्र पडतोय आजारी व्वा रे सत्ताधारी!!! टॅक्समध्ये महाराष्ट्र करतो सर्वाधिक #PAY महाराष्ट्राच्या युवांना मात्र बेरोजगारीचा #WAY! हे ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.

एका वृत्तपत्रात आलेल्या नोटीसनुसार हे कार्यालय मुंबईतल्या अंधेरी भागात असलेल्या बोस्टन हाऊस या ठिकाणाहून आता कर्नाटकमधल्या बंगळुरूमध्ये स्थलांतरित केलं जाणार आहे. १६ ऑगस्ट २०२२ ला झालेल्या आमसभेतच या बाबतचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. कंपनी कार्यालयाच्या प्रस्तावित बदलामुळे कोणत्याही व्यक्तीचं हित प्रभावित होण्याची शक्यता असेल तर त्यांनी आक्षेप नोंदवावा त्यासाठी चौदा दिवसांची मुदत देण्यात आली आहे असंही कंपनीने म्हटलं आहे. फोन पे हे गुगल पे नंतर वापरलं जाणारं सर्वाधिक सोपं असं डिजिटल पेमेंट अॅप आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT