
Ajit Pawar Press Conference: मुंबई: विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Maharaj)हे धर्मवीर (Dharmaveer) नसून स्वराज्यरक्षक (Swarajyarakshak) असल्याचं वक्तव्य विधानसभेत केलं होतं. ज्यानंतर भाजपसह (BJP) सत्ताधाऱ्यांनी अजित पवारांविरोधात जोरदार आंदोलनं केली. याप्रकरणातील वाढता विरोध लक्षात घेऊन काल (3 डिसेंबर) स्वत: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवारांच्या वक्तव्याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं की, संभाजीराजेंना स्वराज्यरक्षक किंवा धर्मवीर म्हणण्यात काहीही वावगं नाही. तसेच हा वाद वाढू नये यासाठी शरद पवारांनी हे देखील जाहीर केलं की, अजित पवार हे आपल्यासमोर येऊन त्यांची याबाबतची भूमिका स्पष्ट करतील. (Ajit Pawar has announced to hold a press conference after Sharad Pawar tried to cover up the controversy after Ajit Pawar's statement about Chhatrapati Sambhaji Maharaj.)
खरं तर हा वाद सुरु झाल्यानंतर अजित पवारांनी याबाबत कुठेही प्रतिक्रिया दिली नव्हती किंवा आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. मात्र, अजित पवारांच्या वक्तव्याने पक्षाला फटका बसू शकतं असं लक्षात येता शरद पवारांनी या वादावर पडदा टाकण्याचं काम केलं. तसंच अजित पवार हे भूमिकाही जाहीर करतील हे देखील स्पष्ट केलं. आता स्वत: शरद पवारांनी ही गोष्ट जाहीर केल्याने अजित पवारांना त्यांची भूमिका मांडणं भागच आहे.
यासाठीच आज (4 डिसेंबर) अजित पवार हे दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. विधानसभेत छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत असं वक्तव्य का केलं याबाबत अजित पवार हे भाष्य करतील.
यामुळे अजित पवार या सगळ्या वादावर नरमाईची भूमिका घेणार की, त्यांनी मांडलेला मुद्दा धरुन ठेवणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
अजित पवार यांनी संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणू नये असं वक्तव्य केलेलं असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मात्र या मुद्द्यावर वेगळं मत व्यक्त केलं होतं.
'छत्रपती संभाजी महाराजांना ज्यांना जे म्हणायचे असेल ते म्हणा. धर्मवीर म्हणायचं असेल तर धर्मवीर म्हणा आणि ज्यांना वाटत असेल त्यांनी स्वराज्याचे रक्षण केले तर त्यांनी स्वराज्यरक्षक म्हणा, त्यावरुन वाद नको. छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हटलं तरी अयोग्य नाही. धर्मवीर, स्वराज्य रक्षक या दोन्ही उपाधी योग्यच आहेत.' असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं होतं.