दादांना पुन्हा देवगिरी! उपमुख्यमंत्र्यांचा बंगला अजित पवारांना कसा काय मिळाला?

मुंबई तक

मुंबई: राज्यात नवीन सरकार स्थापन झालं आहे. एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर अचानक उपमुख्यमंत्री म्हणून फडणवीसांचं नाव घोषित झालं. फडणवीसांनी आधीचे उपमुख्यमंत्री अजित पवारांची (Ajit Pawar) जागा घेतली. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारकडून विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. एकूणच काय तर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यामध्ये […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: राज्यात नवीन सरकार स्थापन झालं आहे. एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर अचानक उपमुख्यमंत्री म्हणून फडणवीसांचं नाव घोषित झालं. फडणवीसांनी आधीचे उपमुख्यमंत्री अजित पवारांची (Ajit Pawar) जागा घेतली. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारकडून विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. एकूणच काय तर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यामध्ये पदांची अदलाबदली झाली. आता या दोघांमध्ये फक्त पदांची अदलाबदली झाली नाही, तर एका गोष्टीची अदलाबदली झाली आहे. ती म्हणजे देवगिरी बंगल्याची.

अजित पवारांना उपमुख्यमंत्र्यांचा बंगला कसाकाय मिळाला?

आपल्याला माहितीये, वर्षा बंगला हा मुख्यमंत्र्यांना दिला जातो. त्यानंतर महत्वाचा आणि भव्य असलेला बंगला म्हणजे मलबार हिल इथला देवगिरी बंगला. हा बंगला सर्वसाधारणपणे उपमुख्यमंत्री किंवा वरिष्ठ मंत्र्यांना दिला जातो. आता राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर हा बंगला उपमुख्यमंत्री फडणवीसांना दिला जाईल आणि अजित पवारांना आता फडणवीस ज्या बंगल्यात राहत आहेत तो सागर बंगला दिला जाईल, अशी शक्यता होती. पण, शिंदे सरकारनं एक पत्रक काढून देवगिरी हा बंगला विरोधी पक्षनेते अजित पवारांनाच देण्याचं जाहीर केलं आहे. म्हणजे देवगिरी हा बंगला उपमुख्यमंत्र्यांना मिळायचा तो आता विरोधी पक्षनेत्यांना मिळणार, तर सागर बंगला हा विरोधी पक्षनेत्यांना मिळायचा तो आता उपमुख्यमंत्र्यांना मिळणार आहे. हा बंगला उपमुख्यमंत्री फडणवीसांना न देता विरोधी पक्षनेते अजित पवारांनाच का दिला? याचंही कारणही या पत्रात दिलं आहे.

या कारणामुळे अजित पवारांना पुन्हा मिळाला ‘देवगिरी’?

देवगिरी हा बंगला उपमुख्यमंत्री किंवा वरिष्ठ मंत्र्यांना दिला जातो. आता विरोधी पक्षनेत्यांना देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. यापुढे त्याचा पायंडा पडणार नाही, म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं शिंदे सरकारनं म्हटलं आहे.

अजित पवारांचा देवगिरी बंगल्यासाठी फोन?

देवगिरी हा बंगला अजित पवारांचा आवडता बंगला आहे. राज्यात १९९९ ला काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार आलं तेव्हापासून अजित पवार देवगिरी बंगल्यावर राहायला गेले होते. १९९९ ते २०१४ या काळात हा बंगला अजित पवारांकडेच होता. पण, २०१४ भाजप-सेना युतीचं सरकार आलं आणि हा बंगला सुधीर मुनगंटीवारांना मिळाला. पण, पुढच्या पाच वर्षात महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि पुन्हा अजित पवारांना देवगिरी बंगला मिळाला.

अजित पवारांची देवेंद्र फडणवीसांना विनंती?

आता राज्यात सत्तांतर झाल्यानंतर अजित पवारांना हा बंगला सोडावा लागणार होता. पण, अजित पवारांनी फडणवीसांना फोन करून देवगिरी बंगल्यासाठी विनंती केल्याची माहिती आहे. आता सरकारनं पत्रक काढल्यानंतर फडणवीसांनी अजित पवारांची विनंती मान्य केल्याचं दिसतंय. इतकंच नाहीतर या अजित पवार आणि फडणवीसांनी आपली जुनी मैत्री जपलीय? अशाही चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. कोणत्या मंत्र्यांना कोणता बंगला मिळतो, याची माहिती आम्ही तुम्हाला देऊ. पण, त्यासाठी आधी मंत्रिमंडळ विस्तार होणं गरजेचं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp