‘मला चुलत्याची (शरद पवार) सवय लागली, आता काय करू?’; अजित पवारांनी एकनाथ शिंदेंची ‘झोप’च काढली

मुंबई तक

‘मी सकाळी सहा वाजेपर्यंत लोकांची कामं करतो’, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर पलटवार केला होता. एकनाथ शिंदे यांच्या विधानावर बोट ठेवत अजित पवारांनी एकनाथ शिंदेंवर मिश्किल भाष्य करत टोलेबाजी केली. पाचोरा येथे आयोजित राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवारांनी भाषण केलं. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंना झोपता कधी? असा प्रश्न केला. त्याचबरोबर सकाळी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

‘मी सकाळी सहा वाजेपर्यंत लोकांची कामं करतो’, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर पलटवार केला होता. एकनाथ शिंदे यांच्या विधानावर बोट ठेवत अजित पवारांनी एकनाथ शिंदेंवर मिश्किल भाष्य करत टोलेबाजी केली.

पाचोरा येथे आयोजित राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवारांनी भाषण केलं. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंना झोपता कधी? असा प्रश्न केला. त्याचबरोबर सकाळी उठून काम करण्याची सवय मला शरद पवारांमुळे लागल्याचंही त्यांनी सांगितलं.

अजित पवार म्हणाले, ‘मुख्यमंत्री कोणताही विषय तिसरीकडेच घेऊन जातात. परवाच पैठणचं भाषण ऐकलं. मला वाटलं मुख्यमंत्री आता काय सांगतील. तर सुप्रिया सुळे, अजित पवार, जयंत पाटील… मी सहा वाजेपर्यंत काम करतो. अरे मग सकाळी सहा वाजेपर्यंत काम करतो, तर हा बाबा उठतो कधी?’

सुप्रिया सुळेंचं विधान, अजित पवारांनी शिंदेंवर झोपेवरून साधला निशाणा

‘माझी बहीण (सुप्रिया सुळे) म्हणाली, माझा दादा (अजित पवार ) सकाळी उठून सहा वाजता कामाला लागतो. आता आहे मला सवय. चुलत्याची (शरद पवार) सवय लागली तर काय करू? वाईट तर नाहीये ना सकाळी उठून काम करणं? त्यावर हे (एकनाथ शिंदे) म्हणाले की, मी सहापर्यंत काम करतो. मग झोपता कधी?’

लईच पुढचं बोलायला लागले; अजित पवारांचा एकनाथ शिंदेंना टोला

अजित पवार म्हणाले, ‘एक दोन दिवस माणूस 24 तास काम करू शकेल किंवा सूरतला गेल्यावर आता पद मिळणार म्हणून जागू शकेल. पण, नंतर कधीतरी तो मेंदू म्हणेल अरे झोप झोप. ६ तास तर झोप पाहिजेच ना राव. आम्ही साहेबांचंही काम बघितलंय ५५ वर्षे. सकाळी ते २ वाजता झोपले तरी ते सकाळी ७ वाजता तयार असायचे. पण, पाच-सहा तास झोप घ्यायचेच ना. पटेल असं बोला राव. लईच पुढचं बोलायला लागले.’

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, ‘तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात. आम्हा सगळ्यांचे मुख्यमंत्री आहात. तुमच्याबद्दल आदर आहे, प्रेम आहे. पण, तु्म्ही काहीही पटण्या न सारखं बोलले तर आम्हाला बोलावं लागेल. नाईलाज नाही. महागाई, बेरोजगारीबद्दल काही बोलत नाही. दुसऱ्याच मुद्दा काढतात’, अशी टीका अजित पवारांनी केली.

हे वाचलं का?

    follow whatsapp