औरंगाबाद: औरंगाबादमध्ये शिंदे गट आणि शिवसेना आमने-सामने आले आहेत. शिंदे गटाचे मंत्री संदीपान भुमरे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यात वाकयुद्ध पाहायला मिळाले. संदीपान भुमरे गावठी मंत्री आहेत, त्यामुळे ते काहीही बोलत असतात अशी टीका चंद्रकांत खैरे यांनी केली होती, त्याला आता भुमरेंनी उत्तर दिले आहे.
काय म्हणाले संदीपान भुमरे?
संदीपान भुमरे गावठी आहेत या टीकेला उत्तर देताना भुमरे म्हणाले ”होय मी आहेच गावठी, पण मी कुठेही काही बोलत नाही. ज्यांनी टीका केली ते चंद्रकांत खैरेच शिवसेनेत नाराज आहेत. ठाकरे गटात राहिलेले अनेक आमदार शिंदे गटात येणार आहेत” असा दावाही यावेळी संदीपान भुमरेंनी केला आहे.
भुमरेंनी माध्यमांशी बोलताना मातोश्रीकडे देखील टिकेचे बाण सोडले आहेत. ”चंद्रकांत खैरेंना मातोश्रीवरती कोणी विचारत नव्हतं. आम्ही उठाव केला म्हणून खैरेंनी किंमत मिळाली. खैरे म्हणजे औरंगाबाद जिल्ह्याला लागलेली कीड आहे, शहराची वाट चंद्रकांत खैरेंनी लागली” अशी टीका देखील संदीपान भुमरेंनी केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
चंद्रकांत खैरेंना गावठी म्हणून हिनवल्यानंतर शिंदे गटातील 10-12 आमदार फोन करुन म्हणतात आमचं चुकलं! एकनाथ शिंदेंसोबत गेलेले 10-12 आमदार पुन्हा शिवसेनेसोबत येणार असल्याचा विश्वासही खैरेंनी व्यक्त केला होता.
त्याला प्रत्युत्तर देताना भुमरे म्हणाले ”उद्धव ठाकरेंचे समर्थक 2 आमदार आमच्या संपर्कात आहेत, ते लवकरच शिंदे गटात येतील असं संदीपान भुमरे म्हणाले, त्यावर खैरे म्हणाले ”आमच्याकडचं कुणीही शिंदेगटात जाणार नाही उलट शिंदे गटातील 40 आमदार आम्हाला फोन करत आहेत.”
दरम्यान एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड केल्यानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट अनेकदा आमने-सामने आले आहेत. एकनाथ शिंदे आणि त्यांचा 40 आमदारांचा गट आम्ही गद्दारी केली नाही तर उठाव केला म्हणत आहेत. तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटातील नेते शिंदे गटातील आमदारांना ‘गद्दार’ म्हणत आहेत. एका बाजून एकनाथ शिंदे महाराष्ट्राभर दौरे काढत आहेत तरल आदित्य ठाकरे बंडखोरांच्या मतदार संघात जाऊन थेट आव्हान देत आहेत.