Bhajanlal Sharma : भाजपला का हवा होता ब्राह्मण चेहरा? मुख्यमंत्री निवडीची Inside Story
वसुंधरा राजे या मुख्यमंत्री होतील, असे अंदाज बांधले जात असताना भाजपने मुख्यमंत्रिपदी भजनलाल शर्मा यांना बसवले. त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पण, त्यांची निवड का करण्यात आली… जाणून घ्या…
ADVERTISEMENT

Bhajanlal Sharma Rajasthan New CM : गेल्या काही दिवसांपासून राजस्थानमधील मुख्यमंत्री निवडीचा सस्पेन्स अखेर संपला आहे. काँग्रेसच्या अशोक गेहलोत यांच्यानंतर भाजप आमदार भजनलाल शर्मा हे राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजेंच्या हातात एक चिठ्ठी दिली गेली. त्या चिठ्ठीत काय लिहिले होते, हे शेवटच्या क्षणापर्यंत सस्पेन्सच राहिले. त्यातील माहिती कुणालाही कळली नाही. चिठ्ठी वसुंधरा राजेंच्या हातात दिली गेली, पण चिठ्ठीत नाव भजनलाल शर्मा यांचे होते. पहिल्यांदाच आमदार झालेले भजनलाल शर्मा यांना राजस्थानचे मुख्यमंत्री केले गेले. त्यामुळे भाजपने हा निर्णय का घेतला, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. (why BJP was looking for a Brahmin face in Rajasthan)
3 डिसेंबर रोजी राजस्थानचा निकाल जितका लक्ष वेधून घेणारा होता, तसंच काहीसं घडलं 12 तारखेला राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या निवडीवेळी. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत शेवटच्या रांगेत बसलेले पहिल्या वेळी आमदार झालेले भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्री केले जाणार गेले. कार्यकर्त्यांप्रमाणे शेवटच्या रांगेत उभे असलेले आमदार भजनलाल शर्मा मुख्यमंत्री बनल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
भाजपने धक्के देण्याची केली हॅट्ट्रिक
छत्तीसगडमध्ये रमणसिंग यांना बाजूला करून विष्णू देव साय यांना मुख्यमंत्री बनवण्याचे जे धक्कातंत्र सुरू झाले, ते शिव’राज’ संपवून मोहन यादव यांना पुढे करत मध्य प्रदेशात सुरू राहिले. त्यानंतर मंगळवारी वसुंधरा राजे यांना अलगद बाजूला ठेवून भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्री करत भाजपने आश्चर्याचे धक्के देण्याची हॅट्ट्रिक साधली.
राजस्थानमध्ये भजनलाल शर्मांना का निवडले?
भजनलाल शर्मा यांना निवडून आणून भाजपने केवळ राजस्थानमध्ये नव्या नेतृत्वाला वाट करून दिली आहे, असे समजणे मर्यादित होईल. कारण असं म्हटलं जात आहे की, भाजपने राजस्थानातून भजनलाल यांच्या माध्यमातून जो डाव टाकला आहे, तो फक्त राजस्थानपुरताच मर्यादित राहणार नाही.










