
राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख तोंडावर आली असून, महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठ्या घटना घडमोडी सुरू आहेत. सहाव्या जागेसाठी शिवसेना-भाजपची प्रतिष्ठा पणाला लागलेली असून, दगाफटका होऊन नये म्हणून आमदारांना हॉटेल बंद केलं जात आहे. भाजपनंही मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये आमदारांसाठी रुम्स बुक केल्या आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांची पुन्हा एक बैठक होणार आहे.
२४ वर्षांनंतर महाराष्ट्रात राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. सहाव्या जागेवर तडजोडी न झाल्याने आता ही जागा कोण जिंकणार याची उत्सुकता लागली आहे.
दरम्यान, सहाव्या जागेवर शिवसेनेनं संजय पवार, तर भाजपनं धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिलीये. त्यामुळे भाजप आणि शिवसेना आपापल्या उमेदवारांना निवडणूक आणण्यासाठी व्यहरचना आखताना दिसत आहे.
भाजप आणि शिवसेनेला आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी अपक्षांची गरज असून, आता त्यासाठीच दोन्हीही पक्षांकडून प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे पक्षाच्याच आमदारांची पळवापळवी होऊ नये म्हणून आता आमदारांना हॉटेल मध्ये ठेवलं जात आहे.
शिवसेनेनं आपल्या आमदारांची व्यवस्था मुंबईतील द रिट्रीट हॉटेलमध्ये केलीये. आधी शिवसेना आमदारांना ट्रायडंट हॉटेलमध्ये ठेवणार होती. मात्र, भाजपनंही याच हॉटेलमध्ये आमदारांची व्यवस्था केल्याचं समजल्यानंतर शिवसेनेनं दुसरं हॉटेल शोधलं.
उद्धव ठाकरेंनी घेतली बैठक
सोमवारी सायंकाळी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या तसेच समर्थक अपक्ष आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी कोणत्याही दबाबाशिवाय मतदान करण्याचं आवाहन केलं.
सोमवारी (६ जून) शिवसेना आणि अपक्ष आमदारांची बैठक घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आजही (७ जून) बैठक आहे. ही बैठक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसोबत असणार आहे. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे आमदारांची व्यवस्था मतदानापर्यंत हॉटेलमध्ये केली जाणार आहे.
भाजपकडूनही तिन्ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न होताना दिसत आहे. भाजप नेते आशिष शेलार यांच्या म्हणण्यानुसार भाजपला इतर कोणत्याही पक्षाची गरज नाही. भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी होणार आहेत. महाविकास आघाडी क्रॉस व्होटिंगची भीती आहे, त्यामुळेच त्यांनी आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलंय, असं शेलार यांनी सांगितलं.