तुरूंगाची कल्पना नसलेले सावरकरांच्या सुटकेवर बोलतात तेव्हा…, संजय राऊतांनी राहुल गांधींना सुनावलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान वीर सावरकरांबद्दल विधान केलं. राहुल गांधींच्या विधानावरून महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून निघालं. भाजप, मनसेनं निषेध नोंदवला. शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भूमिकेपासून अंतर राखलं. आता वादावर खासदार संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून भाष्य करताना राहुल गांधी, भाजपला खडेबोल सुनावलेत.

संजय राऊत ‘रोखठोक’मध्ये लिहितात, “वीर सावरकरांवर नाहक टीका करून राहुल गांधी यांनी वादळ ओढवून घेतले. ‘भारत जोडो’ यात्रेचा तो अजेंडा नव्हता. भाजप सावरकरांच्या अपमानाविरुद्ध रस्त्यावर उतरला. सावरकरप्रेमाचे हे ढोंगच म्हणावे लागेल. संघ सावरकरांचा कठोर टीकाकार राहिला, पण आज राजकीय स्वार्थासाठी भाजप सावरकरवादी झाला. सावरकरांनी 10 वर्षे अंदमानच्या काळ्या पाण्यावर नरकयातना भोगल्या. त्या देशासाठीच होत्या याचा विसर पडू नये!”

पुढे संजय राऊतांनी म्हटलंय की, “राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेनं महाराष्ट्राचं वातावरण ढवळून निघालं. त्या यात्रेस वीर सावरकरांवरील नाहक टीकेने गालबोट लागले. अंदमानच्या तुरुंगात सावरकरांनी 10 वर्षांपेक्षा जास्त काळ नरकयातना भोगल्या त्या देशाच्या स्वातंत्र्यासाठीच, हे राहुल गांधी यांना कोणीतरी समजावून सांगायला हवं”, अशा शब्दात संजय राऊतांनी राहुल गांधींना खडेबोल सुनावलेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

“सावरकरांनी सुटकेसाठी ब्रिटिशांना माफीनामा लिहून दिला हा काही राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा अजेंडा नव्हता आणि महाराष्ट्रात तर हा अजेंडा असताच कामा नये. महाराष्ट्रात येऊन श्री. राहुल गांधी यांनी प्रश्न केला, ‘भाजपवाले बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या अशा प्रश्नांवर का बोलत नाहीत.’ गांधी यांचा प्रश्न योग्य आहे, पण त्यांनी सावरकरांची माफी हा विषय काढला आणि गोंधळ झाला. मात्र दुसऱ्या दिवशी शेगावच्या जाहीर सभेत त्यांनी सावरकरांबद्दल मौन बाळगले, हे एका अर्थाने योग्यच झाले. तरीही त्यांना सांगावेसे वाटते की, तुम्ही वारंवार लोकांच्या श्रद्धांना असे का डिवचता व भाजपला विषयांतर करण्यासाठी हत्यार का देता?”, असा सवाल संजय राऊतांनी राहुल गांधींना केलाय.

“अटकेत असलेला कोणताही बंदी त्याच्या सुटकेसाठी हरतऱहेचे कायदेशीर प्रयत्न करीत असतो. 10 वर्षांपेक्षा जास्त काळ अंदमानात नरकयातना (देशासाठी) भोगल्यावर सावरकरांनी ‘डावपेच’ म्हणून दिलगिरी व्यक्त करून सुटकेचा मार्ग निवडला असेल तर त्यास शरणागती-माफीनामा म्हणता येणार नाही. आज ‘ईडी’सारख्या स्वतंत्र हिंदुस्थानातील तपास यंत्रणांच्या भयाने भले भले एका रात्रीत ‘स्वदेशी’ सरकारला शरण जातात. पक्ष बदलतात. स्वतःच्या निष्ठा विलीन करतात. सावरकरांनी दशकभर अंदमानात ज्या यातना सहन केल्या त्या राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी”, असं राऊतांनी रोखठोक सदरात म्हटलंय.

ADVERTISEMENT

“राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ने जी सकारात्मक ऊर्जा, आत्मविश्वास निर्माण केला त्यावर सावरकरांवरील भाष्याने पाणी पडले. पंतप्रधान मोदी यांनी जवाहरलाल नेहरूंना लक्ष्य केले, तर राहुल गांधी वीर सावरकरांना लक्ष्य करीत आहेत. स्वातंत्र्य लढ्यात दोघांचं योगदान तोलामोलाचं आहे. सावरकरांनी तर सर्व सुखांचा त्याग करून अंदमानचा मार्ग स्वीकारला. पुन्हा तुरुंग काय असतो याची कल्पना नसलेले सावरकरांच्या सुटकेवर बोलतात तेव्हा आश्चर्य वाटतं”, असं म्हणत राऊतांनी राहुल गांधींवर निशाणा साधलाय.

ADVERTISEMENT

संजय राऊतांचं भाजपवरही टीकास्त्र

याच लेखाच्या शेवटी संजय राऊत म्हणतात, “दोन महत्त्वाचे मुद्दे येथे देतो आणि विषय संपवतो. पत्रकार निखिल वागळे यांनी समाज माध्यमांवर एक सत्य सांगितले. ते म्हणतात, ‘संघाने आयुष्यभर हिंदू महासभा आणि सावरकरांचा राग राग केला. गोळवळकरांनी सावरकरांवर कठोर टीका केली आहे. आता राजकीय फायद्यासाठी भाजप आणि संघ त्यांना वापरताहेत.’ हे परखड सत्य आज दिसतेच आहे.”

“सावरकरांच्या राहुल गांधीकृत अपमानाबद्दल महाराष्ट्रात भाजप, मनसेसारखे लोक रस्त्यावर उतरले. त्यांच्यासाठी पत्रकार शकील अक्तर यांनी एक प्रेमळ संदेश प्रसिद्ध केला आहे, ‘अगर बीजेपी सावरकर को सबसे बडा देशभक्त मानती तो सबसे ऊंची मूर्ती सरदार पटेल की नहीं, उनकी लगती. इंडिया गेट पर भी सुभाषचंद्र बोस की जगह सावरकर की मूर्ती लगती. मगर बीजेपी ने भी पटेल, सुभाषबाबू को ही महान देशभक्त माना.’ वीर सावरकरांचे क्रांतिकार्य महान होते, पण आज भाजपास सावरकरप्रेमाचा जो उमाळा आलाय ते सरळ सरळ ढोंग आहे”, असं म्हणत राऊतांनी भाजपलाही लक्ष्य केलंय.

संजय राऊतांचा राहुल गांधींना सवाल

संजय राऊत म्हणतात, “पंतप्रधान मोदी नेहरूंच्या बदनामीची भूमिका सोडत नाहीत. राहुल गांधींनी सावरकरांना त्याच कारणासाठी पकडले, हा देशाचा अजेंडा नाही. अशाने भारत कसा जोडणार?”, असा सवाल संजय राऊतांनी भारत जोडो यात्रेच्या संदर्भानं राहुल गांधींना केलाय.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT