
काँग्रेस नेते शशी थरूर यांनी सोमवारी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. या दरम्यान त्यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत सोनिया गांधींना प्रश्न विचारला. काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक मला लढवायची असेल तर मी लढवू का? असा प्रश्नही शशी थरूर यांनी सोनिया गांधी यांना विचारल्याचं कळतंय. यावर सोनिया गांधी Its Your Call असं म्हणाल्या आहेत. त्यामुळे आता अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा चेंडू थरूर यांच्या कोर्टात आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार शशी थरूर हे काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकतात. मात्र ही निवडणूक लढवायची आहे की नाही हा त्यांचा व्यक्तिगत निर्णय असणार आहे. मात्र याबाबत तुम्ही काय तो निर्णय घ्या असं सोनिया गांधी यांनी शशी थरूर यांना सांगितल्याचं कळतंय. आज तकने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.
सोनिया गांधी यांची आणि शशी थरूर यांच्यात जी चर्चा झाली त्यात अध्यक्षपदाचा प्रश्न जेव्हा शशी थरूर यांनी विचारला तेव्हा तो निर्णय तुमचा तुम्ही घ्या असं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. याचाच अर्थ आता काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी कुणीही स्वतंत्र आहे. गांधी परिवाराने यासाठी कोणताही उमेदवार दिलेला नाही. आज तकच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शशी थरूर हे काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकतात.
शशी थरूर काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार का? या चर्चा होत असतानाच त्यांनी लिहिलेल्या एका लेखाचीही चर्चा होते आहे. यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की जर काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक असेल तर त्यामध्ये एकापेक्षा जास्त उमेदवार असले पाहिजेत असं शशी थरूर यांनी म्हटलं होतं. लोकशाहीसाठी हा चांगला संकेत असेल असं शशी थरूर यांनी म्हटलं होतं. हा लेख लिहिल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी हे म्हटलं होतं की काही लोक हे स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतात. काँग्रेस हा लोकशाही व्यवस्था मानणारा पक्ष आहे. काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक होत असेल तर तर त्यात एकाहून अधिक उमेदवार असले पाहिजेत.
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आहेत असंही बोललं जातं आहे. गहलोत हे २६ ते २८ सप्टेंबरच्या दरम्यान काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरू शकतात अशी शक्यता आहे. त्यांच्या नावाची चर्चा याआधीही झाली होती.