BMC Election 2026: खळबळ उडवून देणारा सर्व्हे... 'ठाकरे आणि शिंदेंनी एकत्र यावं', एवढ्या टक्के लोकांनी दिला भलताच कौल!
BMC Election and Shiv Sena Allaince: मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे, मनसे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं अशी प्रबळ इच्छा मुंबईकरांनी व्यक्त केली आहे. असेंडिया सर्व्हेतून ही माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या तोंडावर मुंबईकरांच्या राजकीय मतांचा वेध घेणाऱ्या असेंडिया कंपनीच्या ताज्या सर्व्हेमध्ये शिवसेना UBT, मनसे आणि शिवसेना (शिंदे) या तीनही पक्षांनी एकत्र यावं अशी इच्छा मुंबईकरांमध्ये प्रबळ असल्याचे दिसून आले आहे. उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या तीन पक्षांनी एकत्र यावे अशी इच्छा सर्व्हेतील 52 टक्के मुंबईकरांनी व्यक्त केली आहे. या नव्या सर्व्हेने मुंबईच्या राजकीय वातावरणात नवे चर्चेचे वारे वाहू शकतात.
असेंडिया कंपनीने मुंबईतील विविध भागांतील नागरिकांशी केलेल्या या सर्व्हेमध्ये शिवसेनेचे दोन गट, पक्षाची ओळख आणि स्थानिक प्रतिनिधींच्या कामगिरी भर देण्यात आला. BMC निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा सर्व्हे महत्त्वपूर्ण मानला जात आहे, कारण मुंबई महापालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असून, येथील सत्ता कोणाच्या हाती जाईल यावर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरू शकते.
दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात अशी अनेकांची इच्छा
सर्व्हेतील मुख्य प्रश्न होता: "मूळ शिवसेनेतून तयार झालेले आजचे तीन पक्ष म्हणजे शिवसेना UBT, मनसे आणि शिवसेना शिंदे गट यांनी एकत्र यावे का?" यावर मुंबईकरांनी दिलेली उत्तरे अशी आहेत:
- होय: 52 टक्के
- नाही: 22 टक्के
- तटस्थ: 25 टक्के
- सांगता येत नाही: 1 टक्के

या आकडेवारीवरून स्पष्ट होते की, मुंबईकर शिवसेनेच्या एकसंध स्वरूपाची अपेक्षा करत आहेत. शिवसेनेची मूळ ओळख बाळासाहेब ठाकरेंच्या काळातील एकजुटीशी जोडलेली आहे, आणि सध्याच्या गटबाजीमुळे पक्षाच्या पारंपरिक मतदारांमध्ये अस्वस्थता आहे. सर्व्हेतील 52 टक्के लोकांच्या मताने हे दाखवते की, एकीकरण झाल्यास पक्षाची ताकद वाढू शकते आणि BMC निवडणुकीत त्याचा फायदा होऊ शकतो.










