
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचं भवितव्य काय? एकनाथ शिंदेंचं पुढचं पाऊल काय असणार? भाजपच्या गोटात काय चाललंय, या आणि अशा प्रश्नांनी राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. आमदारांनी शिवसेनेला आव्हान दिल्यानंतर आता 'मातोश्री'वर घडामोडी सुरूये. त्यातच आता शिवसेनेनं १६ बंडखोरांचं सदस्यत्व करण्याची शिफारस केली आहे.
विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात राजकीय वर्तुळ हादरलं. शिवसेना आमदारांचा एक मोठा गट घेऊन एकनाथ शिंदे सुरतला पोहोचले. त्यानंतर सर्व आमदारांना गुवाहाटीला देण्यात आलं. एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ अनेक आमदार गुवाहाटीत जाऊन पोहोचले आहेत.
अचानक झालेल्या या बंडानंतर आता शिवसेनेनं बंडखोर आमदारांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यास सुरूवात केली आहे. शिवसेना सुरुवातीला १२ आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी विधानसभा उपाध्यक्षांकडे केली होती. आता समोर आलेल्या माहितीनुसार शिवसेनेनं त्यात आणखी चार जणांची नावं जोडली आहे. त्यामुळे एकूण १६ जणांची आमदारकी रद्द करण्याची शिफारस शिवसेनेकडून करण्यात आली आहे.
शिवसेनेची विधी विभागाची एक टीम आता विधानभवनात पोहोचली आहे. १६ आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करणार पत्र विधानसभा उपाध्यक्षांना दिलं जाणार असून, आता उपाध्यक्ष काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलं आहे. शिवसेनेचे लीगल टीमसोबत शिवसेनेचे खासदार अरविंद सावंतही आहेत. तेही विधानभवन परिसरात आलेले आहेत.
ते १६ आमदार कोण?
१) संजय शिरसाट
२) अब्दुल सत्तार
३)भरत गोगावले
४) संदीप भामरे
५) महेश शिंदे
६) अनिल बाबर
७) बालाजी कल्याणकर
८) एकनाथ शिंदे
९) लता सोनावणे
१०) प्रकाश सुर्वे
११) यामिनी जाधव
१२) तानाजी सावंत
१३) रमेश बोरनारे
१४) चिमणराव पाटील
१५) संजय रायमूलकर
१६) बालाजी किणीकर
एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केले इरादे
दोन तृतीयांशपेक्षा जास्त आमदार स्वतःच्या बाजूने वळण्यात यश आलेल्या एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेलाच आव्हान दिलं आहे. १२ आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्याची माहिती समोर आल्यानंतरच एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत त्यांचे इरादे स्पष्ट केले.
एकनाथ शिंदेंचं ट्विट काय?
"कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय? तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो! घटनेच्या 10 व्या परिशिष्टाप्रमाणे (शेड्युल) व्हीप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल आहेत."
"12 आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला अजिबात घाबरवू शकत नाही. कारण आम्हीच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना व शिवसैनिक आहोत. कायदाही जाणतो, त्यामुळे असल्या धमक्यांना भीक घालत नाही. तुम्ही संख्या नसताना अवैध गट तयार केला म्हणून तुमच्यावरच कारवाईची आमची मागणी आहे."