
shiv sena (ubt) hits out modi government : "सगळीकडे ताटाखालचीच मांजरे हवीत आणि सरकारी हुकमांना 'होयबा' म्हणणारे लोक हवेत, अशी हुकूमशाही मानसिकता असणाऱ्या लोकांच्या हाती आज देशाचे प्रजासत्ताक सापडले आहे", असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेनं (Shiv Sena UBT) मोदी सरकारवर (Modi Government) टीकेची तोफ डागलीये. 74व्या प्रजासत्ताक दिनी (74th republic day) सामनाच्या अग्रलेखातून (Saamana Editorial) विविध प्रश्न उपस्थित करत शिवसेनेनं (ubt) सरकार उलथवून टाकण्यासाठी जनतेला पुढे येण्याचं आवाहनही केलंय. (Saamana Editorial on 74th republic day 2023)
सामना अग्रलेखातून शिवसेनेची विविध मुद्द्यांवर भूमिका मांडली जाते. 74व्या प्रजासत्ताक दिनी प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखात म्हटलंय की, "सालाबादप्रमाणे आजच्या 74व्या प्रजासत्ताक दिनीदेखील राष्ट्रपतींचे लाल किल्ल्यावरील भाषण आणि इतर सरकारी सोपस्कार पार पडतील, पण ज्या जनतेचे हे प्रजासत्ताक आहे, त्या सर्वसामान्य जनतेचे जगण्या-मरण्याचे जे असंख्य प्रश्न आहेत, त्यांची उत्तरे त्यातून मिळणार आहेत का?", असा रोखठोक सवाल सेनेनं उपस्थित केलाय.
शिवसेनेनं अग्रलेखात पुढे म्हटलंय की, "हे प्रश्न जर 74व्या प्रजासत्ताक दिनीही कायमच असतील, किंबहुना या प्रश्नांचे काहूर अधिकच माजत असेल तर आपल्या देशात खरोखरच प्रजेची सत्ता अस्तित्वात आहे, असे कसे म्हणता येईल? केवळ मुंबई, दिल्ली, बंगलोर, कोलकाता येथील उंच टॉवर आणि चमकधमक म्हणजेच काही हिंदुस्थान नव्हे! या महानगरांच्या पलीकडे जो खंडप्राय देश पसरला आहे, तेथील जनतेचे काय?", असा प्रश्न उपस्थित करत केंद्र सरकारला लक्ष्य केलंय.
गेल्या काही वर्षात केंद्रीय तपास यंत्रणा, रिझर्व्ह बँक, निवडणूक आयोग यासह विविध संस्थांच्या स्वायत्ततेबद्दल प्रश्न उपस्थित होताहेत. यावरून शिवसेनेनं म्हटलंय की, "राज्यघटना स्वीकारली तो दिवस म्हणून आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो. त्या घटनेप्रमाणेच हा देश चालेल, असा शब्द देऊन आपण राज्यघटना स्वीकारली, पण आज देशात घटनेप्रमाणे एखादे तरी काम सुरू आहे काय? घटनेने न्यायपालिका, निवडणूक आयोग, रिझर्व्ह बँक वगैरे संस्थांना दिलेली स्वायत्तता विद्यमान सरकारला मान्य नाही."
"सगळीकडे ताटाखालचीच मांजरे हवीत आणि सरकारी हुकमांना ‘होयबा’ म्हणणारे लोक हवेत, अशी हुकूमशाही मानसिकता असणाऱ्या लोकांच्या हाती आज देशाचे प्रजासत्ताक सापडले आहे. घटनाविरोधी कारवाया करून विरोधी पक्षांची सरकारे उलथविली जातात, घटनाबाहय़ सरकारे आणली जातात", असं म्हणत गेल्या काही वर्षात अनेक राज्यात कोसळेल्या सरकारांवरून शिवसेनेनं भाजपवर हल्ला चढवला आहे.
"पक्षपाती निर्णय घेऊन एका राज्यातील उद्योग दुसऱ्या राज्यात पळवले जातात. या दडपशाहीलाच प्रजासत्ताक म्हणावे काय? निवडक लोक तुपाशी आणि बहुसंख्य जनता उपाशी, असे भेसूर चित्र 74 व्या प्रजासत्ताक दिनी दिसत असले तरी भविष्यात बदल घडवावाच लागेल", असं शिवसेनेनं (UBT) म्हटलं आहे.
"मूठभरांसाठी काम करणारी सत्ता उलथवून खरेखुरे जनतेचे राज्य यावे यासाठी देशातील प्रजेलाच आता एकजूट दाखवावी लागेल. घटनाकारांना अपेक्षित असलेला प्रजासत्ताक दिन ‘चिरायू’ ठेवायचा असेल तर मूठभरांची सत्ता जावो आणि प्रजेची सत्ता येवो, हे विद्यमान राज्यकर्त्यांना ठणकावून सांगावेच लागेल!", असं आवाहन शिवसेनेनं सामना अग्रलेखातून केलंय.