‘राज्यपालाला जोड्यानं मारलं पाहिजे!’; शिवसेना आमदार राजन साळवींनी भगतसिंह कोश्यारींना दिला इशारा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईबद्दल केलेल्या वक्तव्याच्याविरोधात विविध स्तरावरून पडसाद उमटत आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे या पक्षातील नेत्यांनी राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याचाविरोधात भूमिका मांडली आहे. आता कोकणातील शिवसेनेकडून देखील निषेध व्यक्त केला जात आहे. शिवसेनेचे उपनेते आमदार राजन साळवी यांनी देखील राजापूरमध्ये तीव्र शब्दात कोश्यारी यांचा निषेध केला आहे. राज्यपालांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

दरम्यान, राजन साळवी यांनी अतिशय तीव्र शब्दात राज्यपालांचा समाचार घेतला. साळवी म्हणाले की, महाराष्ट्राला वेगळी परंपरा आहे, मराठी माणसाचा महाराष्ट्र आहे. मुंबई महाराष्ट्रात यावी यासाठी 107 हुतात्मांनी बलिदान दिलेलं आहे आणि अशा मुंबईबाबत वक्तव्य करणाऱ्या माणसाला जोड्यानी हाणलं पाहिजे, असं राजन साळवी यांनी म्हटलं आहे. अशा तीव्र शब्दात साळवी यांनी राज्यपालांच्या विरोधातील आपली भूमिका मांडली आहे.

माध्यमांशी बोलताना साळवी म्हणाले,गुजराती, राजस्थानी निघून गेले तर नुकसान होईल, असं कोश्यारी म्हणाले होते. तुम्हाला जायचं तर तुम्ही खुशाल जा. महाराष्ट्राला कोणी हात लावू शकत नाही, असं देखील साळवी म्हणाले. तसेच राज्यपाल रत्नागिरीत आले तर त्यांना फिरु देणार नाही, असा इशारा देखील राजन साळवी यांनी दिला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

काय म्हटलं आहे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी?

“कधी कधी मी महाराष्ट्रातल्या लोकांना सांगत असतो की महाराष्ट्रात खासकरून मुंबई आणि ठाण्यातून गुजराथी समाजाचे आणि राजस्थानी समाजाचे लोक निघून गेले तर तुमच्याकडे कुठले पैसे उरणारच नाहीत. मुंबईला जे आर्थिक राजधानी म्हटलं जातं ते म्हटलंही जाणार नाही” असं मुंबईबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी या व्हीडिओत बोलताना दिसत आहेत.

ADVERTISEMENT

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे, विरोधी पक्ष नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले, शिवसेना खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यासंह विरोधी पक्षातील नेत्यांनी राज्यपालांच्या वक्तव्याच्या विरोधात प्रतिक्रिया दिल्या. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी राज्यपालांनी केलेलं वक्तव्य असमर्थनीय आहे, अशी प्रतिक्रिया दिली होती.

ADVERTISEMENT

राज्यपालांनी ज्या कार्यक्रमात हे वक्तव्य केलं होतं, त्या कार्यक्रमात स्वतः उपस्थित असलेले भाजप आमदार नितेश राणे यांनी मात्र राज्यपालांची पाठराखण केली होती. राज्यपालांनी फक्त त्या-त्या समाजाला त्यांच्या योगदानाचे श्रेय दिले असल्याचे राणे यांनी सांगितले. तर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी कोश्यारी यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. राज्यपालांच्या विधानामुळे महाराष्ट्राचा अपमान झालेला नाही, असं ते म्हणाले आहेत. तसेच भाजप आमदार आशिष शेलारांनी भाजप राज्यपालांच्या वक्तव्याचे समर्थन करत नाही, अशी थेट भूमिका मांडून टाकली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT