
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला आता अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत. औरंगाबाद येथील सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असतानाच शिवसेनेने संधी साधून पुन्हा एकदा राज ठाकरेंच्या वर्मावर घाव घातला आहे.
दुपारपर्यंत झोपून रहायचं आणि म्हणायचं भोंग्याचा त्रास होतो अशा शब्दांत नाव न घेता सुभाष देसाईंनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
"सभा सगळेच घेत असतात. आजही एक सुपारी सभा आहे. सुपारीच ती दुसरं काय? दुपारी उठायचं आणि सुपारी घ्यायची, दुसरं काय? कोणीतरी मध्यंतरी व्हॉट्स अपवर एक कार्टून पाठवलं होतं. त्यात असं चित्र होतं की एक बाई आपल्या मुलाला चपलेने फटकावते आणि म्हणते दुपारपर्यंत झोपून राहतोस आणि पहाटे पाचच्या भोंग्याची तक्रार करतोस", असं म्हणत देसाईंनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.
"सरडा रंग बदलतो तो कमी पडेल, एवढे विचार यांचे बदलले आहेत. भगवी शाल घेऊन फोटो काढले म्हणून कोणाला शिवसेना प्रमुख होता येत नाही. त्यांच्या आवाजाची आणि शाल घेण्याची नक्कल करता येईल, पण त्यांच्या विचारांची नक्कल करता येणार नाही. सगळ्या शकुनांना ठेचून शिवसेना पुढे जाणार", असं म्हणत सुभाष देसाईंनी मनसेला आव्हान दिलं आहे.