पोटची दोन्ही पोरं पोलिसांच्या ताब्यात, आई सोनिया गांधींची पोलीस ठाण्यात धाव अन्...
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी नवी दिल्लीतील मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात पोहोचल्या. तिथे पोलिसांनी प्रियांका गांधी यांना ताब्यात घेतले होते. पोलिसांनी नंतर रात्री 9 वाजण्याच्या सुमारास त्यांची सुटका केली.
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना आज (21 जुलै) काही वेळापूर्वी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. ज्यामध्ये राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचाही समावेश होता. दरम्यान, आपल्या दोन्ही मुलांना ताब्यात घेतल्यानंतर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी तात्काळ नवी दिल्लीतील मंदिर मार्ग पोलीस स्टेशन गाठलं. तिथे प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात ठेवले होते. त्यावेळी सोनिया गांधी यांनी मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात प्रियांका गांधी यांची भेट घेतली. यावेळी तिथे मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते जमले होते. प्रियांका यांना भेटल्यानंतर सोनिया गांधी निघून गेल्या. ज्यानंतर थोड्याच वेळात प्रियांका गांधींची पोलिसांनी सुटका केली. दरम्यान, याचवेळी सोनिया यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली होती.
नेमकं काय घडलं?
दुसरीकडे काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि इतर विरोधी नेत्यांना घेऊन जाणारी पोलीस बस ही छत्रसाल स्टेडियमवर दाखल झाली. पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे काढलेल्या मोर्चा आणि आंदोलनादरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या नेत्यांना बसने छत्रसाल स्टेडियमवर आणण्यात आले होते. अखेर रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास सर्व काँग्रेस नेत्यांची सुटका करण्यात आली.
हे ही वाचा>> राहुल गांधींना पोलिसांनी उचललं, नाकही फुटलं.. मोदींच्या घराबाहेर काय-काय घडलं?
मंगळवारी दुपारी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे हे नीट पेपरफुटीचा निषेध करण्यासाठी दिल्लीच्या व्हीआयपी परिसरात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर पोहोचले. या घडामोडीमुळे दिल्ली पोलीस आणि सरकार दोघेही चिंतेत पडले आहेत.
जेव्हाही पंतप्रधान मोदी प्रवास करतात किंवा त्यांच्या शासकीय निवासस्थानी परत येतात, तेव्हा त्यांचा ताफा याच गेटमधून जातो. म्हणूनच, जेव्हा राहुल गांधी या गेटजवळ धरणे आंदोलनावर बसले होते, तेव्हा गृहसचिवांनी स्वतः त्यांना या ठिकाणी धरणे आंदोलन न करण्याची विनंती केली होती, कारण हे ठिकाण धरणे आंदोलनासाठी अनुकूल नव्हते. यापूर्वी, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनीही राहुल गांधी यांची भेट घेऊन त्यांना तिथे धरणे आंदोलन न करण्याचा सल्ला दिला होता.










