“शिवसेनेच्या 40 आमदारांना संधी”, बंड अजित पवारांचं, पण जयंत पाटलांचा शिंदेंना सल्ला
अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 जणांनी शपथ घेतली. त्यानंतर जयंत पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली.
ADVERTISEMENT

Maharashtra Politics News Today : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या वावड्या गेल्या अनेक महिन्यांपासून उठत होत्या. त्यावर 2 जुलै रोजी शिक्कामोर्तब झाले. अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांशी हातमिळवणी करत एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकारी आमदारांनाच चिमटा काढलाय. पाटील नेमकं या म्हणाले तेच पाहुयात… ()
अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 जणांनी शपथ घेतली. त्यानंतर जयंत पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, “लोटस हा सिम्बॉल (चिन्ह) भारतीय जनता पक्षाचा आहे. मला वाटतं की भाजपने महाराष्ट्रात अशी एक घटना केलेली होती. आता ही दुसरी घटना केलेली आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात भाजपबद्दल वेगळ्या भावना पुन्हा एकदा निर्माण झाल्या आहेत. जे शिवसेना फोडल्यानंतर झालं, तेच राष्ट्रवादी फोडल्यावर महाराष्ट्रातील जनता प्रतिक्रिया व्यक्त करेल.”
हेही वाचा >> Maharashtra politics : अजित पवारांनी घेतली शपथ, शरद पवारांनी मानले नरेंद्र मोदींचे आभार
“सुप्रीम कोर्टाचा निकाल वाचला, तर सगळ्याचं गोष्टी स्पष्ट होतील. मी जितेंद्र आव्हाड यांची मुख्य प्रतोद म्हणून निवड केली आहे. पक्षाचा प्रदेश अध्यक्ष म्हणून मी पुन्हा सांगतो की, राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजप-शिंदे गटाला कोणताही पाठिंबा नाहीये. आमच्या पक्षाच्या आदेशाचं, धोरणांचं उल्लंघन करून ज्यांनी सरकारमध्ये शपथ घेऊन मंत्री झाले, त्यांनाही आमच्या पक्षाचा कोणताही पाठिंबा नाही”, असंही जयंत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं.
एकनाथ शिंदेंबद्दल जयंत पाटील काय म्हणाले?
अजित पवारांच्या बंडाबद्दल बोलताना जयंत पाटील यांनी शिंदेंनाही इशारा केला. ते म्हणाले, “संख्या बरीच आमच्याबरोबर आलेली आहे. आता तुमच्या मनाप्रमाणे राज्य चालणार नाही, आता आमच्या मनाप्रमाणे चालेल, असं आता भाजप त्यांना सांगेल.”