MLA Disqualification: कोणाच्या मनातही नसेल असा निकाल देणार नार्वेकर.., मोदी-शाहांसारखं वापरणार धक्कातंत्र?
Rahul Narwekar: शिवसेना आमदार अपात्रता याचिकेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे निकाल सुनावणार आहेत. त्यावेळी ते काही धक्कातंत्राचा वापर करू शकतात अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे.
ADVERTISEMENT

Rahul Narwekar verdict on mla disqualification: मुंबई: शिवसेना आमदार अपात्रता (MLA Disqualification) या बहुप्रतिक्षित याचिकेवर अखेर आज (10 जानेवारी) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आपला निकाल सुनावणार आहेत. शिवसेनेतील बंडानंतर ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. ज्यावर निकाल देताना कोर्टाने शिंदेंचं सरकार कायम ठेवलं होतं. पण त्याचवेळी आमदार अपात्रातेचा चेंडू विधानसभा अध्यक्षांकडे टोलवला होता. याच याचिकेवर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) हे निर्णय सुनावणार आहेत. पण त्यांचा हाच निर्णय धक्कातंत्र देणार असेल का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. (mla disqualification case rahul narwekar will give verdict that no one will have in mind will he use shock tactics like modi shah)
शिवसेनेत एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर त्यांच्यासह 16 आमदारांविरोधात अपात्रता याचिका ही दाखल करण्यात आली होती. पण त्यावर कोर्टाने काहीही निकाल न देता त्याबाबत विधानसभा अध्यक्षांना सुनावणी घेण्यास सांगितलं. ठाकरेंचं सरकार पडल्यानंतर शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यानंतर याप्रकरणी सुप्रीम कोर्टात दिलेल्या निकालात शिंदेंचं सरकार हे कायम ठेवलं होतं. पण शिंदेंनी व्हीप म्हणून भरत गोगावले यांची जी नियुक्ती केली होती ती त्यांनी अवैध ठरवली होती. याच मुद्द्यावर राहुल नार्वेकर यांना प्रामुख्याने निकाल द्यायचा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह त्यांचे अनेक समर्थक हे निकाल आपल्याच बाजूने लागेल असं ठामपणे सांगत आहेत. मात्र, असं असलं तरीही राहुल नार्वेकर हे निकालात काही धक्कातंत्र वापरणार कशी कुजबूज देखील राजकीय वर्तुळात सुरू आहे.
भाजपचं धक्कातंत्राचं राजकारण..
खरं तर राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष म्हणून संबंधित याचिकेवर निर्णय घेण्यास स्वतंत्र आहेत. मात्र, ते ज्या पक्षाचे आमदार आहेत त्या पक्षाचे शिर्षस्थ नेते म्हणजेच मोदी-शाह यांचा धक्कातंत्राचा इतिहास मागील 9 वर्षांपासून संपूर्ण देश पाहत आला आहे. आजवर मोदी-शाह यांनी वेगवेगळ्या राज्यात त्यांच्या धक्कातंत्राने भल्याभल्यांचे अंदाज चुकवले आहेत. पण प्रामुख्याने महाराष्ट्रात त्यांनी आतापर्यंत ज्या पद्धतीचे राजकीय निर्णय घेऊन राजकीय पंडितांना देखील बुचकाळ्यात टाकलंय.. ते पाहता आज देखील अनपेक्षित अशी घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जर मोदी-शाह यांच्या प्रमाणेच राहुल नार्वेकरांनी देखील धक्कातंत्राचा वापर करायचं ठरवल्यास तर या संपूर्ण घटनेचं चित्रच बदलून जाण्याची शक्यता आहे.