राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा गुजरातला हलवला, राज ठाकरे संतापले, मोदी-शाहांवर हल्लाबोल

मुंबई तक

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा गेल्या 72 वर्षांपासून दिल्लीत पार पडत आला आहे. मात्र यंदा हा सोहळा गुजरातमधील केवाडिया येथे पार पडणार आहे. यावरुन मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

ADVERTISEMENT

Raj Thackeray
Raj Thackeray
Google CTA

बातम्या हायलाइट

point

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा गुजरातला हलवला

point

राज ठाकरे संतापले

point

मोदी-शाहांवर हल्लाबोल

Raj Thackeray : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा गेल्या 72 वर्षांपासून दिल्लीत पार पडत आला आहे. मात्र यंदा हा सोहळा गुजरातमधील केवाडिया येथे पार पडणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 22 सप्टेंबर रोजी हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. मात्र दिल्लीत होणारा हा सोहळा गुजरातला हलवल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अशातच मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही यावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करुन नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. 

हे ही वाचा : धाराशिव : मराठा आंदोलकांनी तहसीलदारांची खुर्ची जाळली, जोरदार घोषणाबाजी

राज ठाकरे यांची पोस्ट जशीच्या तशी

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या 72 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच हे पुरस्कार देशाच्या राजधानीच्या दिल्ली शहरातून हलवून गुजरातमध्ये केवाडिया येथे होणार आहेत. देशाच्या आर्थिक राजधानीचं, मुंबई शहराचं महत्व संपवण्याचा खटाटोप एकीकडे सुरू असताना दुसरीकडे देशाच्या राजधानीचं जे महत्व आहे ते हळूहळू संपवण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. मुळात हा पुरस्कार सोहळा हलवण्याचं कारण काय ? स्वतःला काही निर्माण करता आलं नाही की बदल नावं, बदल स्थळं आणि यातून भ्रामक इतिहास निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे असं दिसतंय. बरं कधी ना कधी आता उरलो गुजरातपुरते अशी आपली गत होणार याची खात्रीच वाटत असल्यामुळे किमान तिकडे तरी माहात्म्य निर्माण करून घेऊ हा अट्टाहास सध्या केंद्रातील 2 सत्ताधीशांचा दिसतोय. 

बरं समजा पुरस्कार सोहळ्याचं स्थळ हलवायचं होतं तर ते मुंबईत का नाही आणलं? ज्या दादासाहेब फाळकेंनी भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया घातला त्या राज्यात का नाही पुरस्कार वितरण ?  किंवा देशात सगळ्यात जास्त सिनेमे महाराष्ट्र आणि दक्षिणेतील तामिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा येथे घडवले जातात यापैकी कुठल्या राज्यात हा सोहळा का नाही ? दक्षिणेत तर सिनेमांनी तिथल्या राजकारणाला आकार दिला आहे. गुजरातच का?
या आधी देशात अनेक पंतप्रधान होऊन गेले, ज्यांची जन्मभूमी, कर्मभूमी असलेली राज्य त्यांनी ओढूनताणून मोठी करण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. इथे कॉमनवेल्थ स्पर्धा गुजरातमध्ये, 2023 च्या क्रिकेट वल्डकपचा अंतिम सामना गुजरातमध्ये, बाहेरून राष्ट्राध्यक्ष आले त्यांना गुजरातमध्ये घेऊन जायचं, गिफ्ट सिटी मुंबईतून गुजरातमध्ये न्यायची. या सगळ्यातून नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना काय दाखवायचं आहे की या देशाच्या आजपर्यंतच्या प्रगतीचा पाळणा हा गुजरातमध्ये हलला? आज जो देश उभा आहे तो कित्येक पिढ्यांच्या त्यागातून आणि देशातील प्रत्येक प्रांताच्या योगदानातून उभा आहे. यांना गुजरातपलीकडचा देश फक्त आठवतो त्या त्या राज्यात निवडणुका आल्या की. मग तिकडे जाऊन तिथले कपडे घालून भाषणं करून, माझं कसं या राज्याशी जुनं नातं आहे सांगून मतं मिळवायची एवढंच जमतं का ?

हे ही वाचा : शिंदेंना मोठे आंतरराष्ट्रीय पुरस्कार; लंडन दौऱ्याची इनसाईड स्टोरी काय?

सध्याचे सत्ताधीश ‘कलासक्त’ नाहीत हे माहित आहे. कशाही निवडणुका जिंकायच्या ही एकमेव कला आणि त्यासाठी सगळ्यांवर सक्ती इतकाच यांचा ’कलासक्त’पणाशी संबंध. आणि चित्रपटांशी संबंध म्हणाल तर वाट्टेल ते प्रचारकी सिनेमे बनवून घ्यायचे आणि त्यांना पुरस्कार द्यायला लावायचे इतकाच संबंध. बरं या सगळ्याला दक्षिणेतील इतर सिनेमाप्रेमी राज्य कडाडून विरोध करतील, पण महाराष्ट्रात काहीही घडणार नाही. पण कलाकारांनी या विरोधात आवाज उठवायला हवा. मुद्दा केवाडिया किंवा इतर शहर हा नाही, देशाच्या राजधानीत या पुरस्कराची जी उज्वल परंपरा आहे ती का मोडली जात आहे यावर कलाकारांनी बोललं पाहिजे. नाहीतर उद्या गुजरातमधली स्थळं नसतील तर राष्ट्रीय पुरस्कार नाही असा फतवा पण हे लोकं काढतील. ऑस्कर सोहळा लॉसएंजलिसला होतो . ट्रम्प किंवा बुश किंवा ओबामा यांनी आपल्या राज्यात हा सोहळा नेला नाही.