'मोदींनी कॅमेऱ्याचा नाही मनाचा अँगल बदलावा..', प्रियांका गांधींची लोकसभेत तुफान फटकेबाजी
लोकसभेत अँटी पेपर लीक विधेयकावर चर्चा सुरू असताना काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. तसेच मोदींच्या Instagram रीलवर देखील उपरोधिकपणे टीका केली.
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: लोकसभेत अँटी पेपर लीक विधेयकावर (Anti Paper Leak Bill) सुरू असलेल्या चर्चेदरम्यान काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. पेपर लीक प्रकरणे, विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाई, शिक्षण व्यवस्था, रोजगार, शिक्षणाचा अर्थसंकल्प आणि सरकारच्या भूमिकेवर त्यांनी तीव्र शब्दांत टीका केली. यावेळी संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी त्यांच्या काही वक्तव्यांना आक्षेप घेतला होता. त्यामुळे सभागृहात गदारोळ झाला होता.
पेपर लीकविरोधी विधेयकावर 10 तास चर्चा
एक दिवस आधी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत अँटी पेपर लीक विधेयक मांडले होते. मात्र विरोधकांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सभागृहात भूमिका मांडावी, अशी मागणी केल्यामुळे चर्चा सुरू होऊ शकली नव्हती.
दुसऱ्या दिवशी चर्चा सुरू होताच सुरुवातीला सहा तासांचा वेळ निश्चित करण्यात आला होता. मात्र विरोधकांनी चर्चा वाढवण्याची मागणी केली. त्यावर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सरकार 10 तास चर्चेसाठीही तयार असल्याचे सांगितले. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाची संमती घेत अँटी पेपर लीक विधेयकावर तब्बल 10 तास चर्चा होणार असल्याची घोषणा केली.
'कायदा झाला, पण एकालाही शिक्षा नाही'
प्रियंका गांधी म्हणाल्या की, 2024 मध्ये पेपर लीकविरोधी कायदा मंजूर झाला असला तरी आजपर्यंत एका आरोपीलाही शिक्षा झालेली नाही. त्यांनी आरोप केला की विद्यार्थ्यांची नावे सार्वजनिक केली जात आहेत, मात्र पेपर लीकच्या आरोपींविरोधात तशीच कठोर कारवाई होताना दिसत नाही.
