समजून घ्याः INDIA आघाडीचे नेते भेटले, पण हातातून 51 खासदार निसटले?
प. बंगालच्या विजयानंतर भाजपचा उत्साह प्रचंड वाढला आहे. अशातच आता विरोधकांचे ५१ खासदार आपल्या बाजूने वळविण्यासाठी राजधानी दिल्लीत नव्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. समजून घ्या याचविषयी सविस्तरपणे.
ADVERTISEMENT

नवी दिल्लीः लोकसभा निवडणुकीपूर्वी, २०२३ ला Indian National Developmental Inclusive Alliance म्हणजेच इंडिया आघाडीची स्थापना झाली, तेव्हाचं त्यांचं लोकसभेतलं संख्याबळ होतं १४२. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत याच इंडिया आघाडीने १४२ वरून २३० ची झेप घेतली आणि ३०३ चं बहुमत असलेल्या भाजपला २४० वर घसरवलं. आणि आता दिल्लीतील इंडिया आघाडीच्या बैठकीमुळे ते आता २०२९च्या तयारीला लागलेत का अशी पुन्हा चर्चा सुरू झाली आहे, पण खरोखर इंडिया आघाडीची आता तेवढी ताकद उरली आहे का? 2024 प्रमाणे भाजपला टक्कर देऊ शकतील का?
तृणमूलमधली फूट, शिवसेना UBT मध्ये होऊ घातलेली फूट, दुरावलेली डीएमके, कुठल्याही परिस्थितीत सोबत येण्याच्या मनस्थितीत नसलेली जेडीयू, बीजेडी, YSRCP, टीडीपी यामुळे आता नेमकी इंडिया आघाडीची ताकद किती? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
तृणमूल काँग्रेसचे लोकसभेत २८ खासदार आहेत, त्यातल्या खासदारांनी भाजप नेते भुपेंद्र यादव आणि बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारींची भेट घेतली. पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई टाळण्यासाठी दोन तृतीयांशचं बहुमत म्हणजेच २८ पैकी १९ खासदारांचा गट जमणं गरजेचं आहे. त्यातले १५ तर बंडखोर झालेत, आणखीही लवकरच होतील अशी माहिती आहे. अशात तृणमूल काँग्रेसही खिळखिळा करण्याचा प्रयत्न यशस्वी होताना पाहायला मिळतोय.
दुसरीकडे डीएमके आणि आप. दोन्ही पक्षांनी इंडिया आघाडीपासून फारकत घेतली आहे. त्यामुळे २०२३ ला इंडिया आघाडीच्या निर्मितीवेळी असलेले दोन्ही तगडे पक्ष काँग्रेसवर प्रचंड नाराज असल्याने इंडिया आघाडीतील आप-डीएमकेचं संख्याबळ घटलंय. म्हणजेच २३० पैकी डीएमकेचे २२ आणि आपचे ३ असे २५ खासदार वजा झालेत.
