Sharad Pawar : अजित पवार खोटं बोलताहेत का? पवार म्हणाले, “फक्त एकच तक्रार…”
भाजपसोबत जाण्याबद्दल शरद पवारांनी सातत्याने गाफील ठेवले, असा आरोप अजित पवारांनी केला. तसेच चोरडियांच्या घरी भेटायलाही बोलावलं होतं, असेही अजित पवार म्हणालेले. त्या सगळ्या दाव्यांना शरद पवारांनी उत्तर दिले.
ADVERTISEMENT

Sharad Pawar Ajit Pawar : सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटांत दावे-प्रतिदावे सुरू आहेत. कर्जत येथील मेळाव्यात बोलताना अजित पवारांनी अनेक गौप्यस्फोट करत शरद पवारांना घेरले. त्याला शरद पवारांनी प्रत्युत्तर दिले. पुण्यात शरद पवारांची पत्रकार परिषद झाली. त्यावेळी त्यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी अजित पवार खोटं बोलत आहेत का? असा प्रश्न विचारला. त्यावर पवारांनी सविस्तर भूमिका विशद केली.
अजित पवारांनी केलेल्या गौप्यस्फोटाबद्दल पवार म्हणाले, “माझ्या दृष्टीने मला पहिल्यांदा कळतंय. त्यात बरेचसे स्फोट होते. मग त्यात स्फोट होता का? बॉम्ब होता का? फटाकडा होता की दुसरं काही होतं? या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल.”
“माझ्याशी सुसंवाद ठेवण्याचा अधिकार”
अजित पवारांनी सांगितलं की, तुम्ही त्यांना वारंवार बोलावलं. त्यावर शरद पवार म्हणाले की, “असं आहे की माझ्याकडून कधीच बोलवणं नव्हतं. पक्षाचा अध्यक्ष होतो. पक्षाच्या कोणत्याही सदस्याला, कोणत्याही प्रश्नाच्या संदर्भात माझ्याशी सुसंवाद ठेवण्याचा अधिकार असतो.”
हेही वाचा >> ‘ज्यांना मोठं केलं त्यांनीच…’ शरद पवारांचा अजितदादांवर पलटवार
“ज्या काही मागण्या केल्या होत्या, त्यासंबंधी चर्चा झाली नव्हती, असे मी म्हणत नाही. चर्चा झाली. ते ज्या रस्त्याने जाण्याचा विचार करत होते, तो विचार आम्हाला लोकांना किंवा जनमानसात आम्ही जे शब्द दिले, त्यासंदर्भात सुसंगत नव्हता. विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही जी मते मागितली, ती भाजपमध्ये जाण्यासाठी कधी नव्हती. ती निश्चित एका कार्यक्रमासाठी होती. मी एवढंच म्हणेन भाजप आणि त्यांचे प्रमुख यांच्याविरुद्ध होती. जे आमचे लोक निर्वाचित झाले, त्यांना या भूमिकेला लोकांचा पाठिंबा होता”, असे शरद पवार यांनी सांगितले.