‘बावन’ आणे, कमळबाई आणि शिंदेंचे शाप; शिवसेनेचा (UBT) भाजपवर घणाघात
फडतूस शब्दावरून राज्यात भाजपविरुद्ध ठाकरे असा राजकीय वाद बघायला मिळत आहे. ठाकरेंनी आता देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका आहे.
ADVERTISEMENT

ठाण्यात झालेल्या मारहाणीच्या प्रकरणानंतर उद्धव ठाकरेंनी फडतूस गृहमंत्री म्हणत देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला होता. त्याला फडणवीसांनी मी काडतूस आहे म्हणत उत्तर दिलं. पण, यावरून राजकीय कलगीतुरा चांगलाच रंगला आहे. आता शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सामना अग्रलेखातून फडणवीसांवर टीकेचे बाण डागले आहेत. दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना बावन आणे म्हणत डिवचलं आहे.
फडतूस शब्दावरून रंगलेल्या राजकीय वादावर भाष्य करताना शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सामना अग्रलेखात म्हटले आहे की, “आपण फडतूस नसून काडतूस असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात जाहीर केले आहे. ते काडतूस असतील किंवा आणखी काही, पण महाराष्ट्रावर एक फडतूस सरकार राज्य करीत आहे व या सरकारने महाराष्ट्राची सर्वच पातळ्यांवर अप्रतिष्ठा करायचा विडा उचलला आहे. राज्य सरकार किंवा ते चालवणारे फडतूस आहेत असे फक्त लोकांनाच वाटत नाही, तर देशाच्या सर्वोच्च न्यायालयासही वाटते. महाराष्ट्राचे सरकार ‘नपुंसक’ आहे म्हणजेच बिनकामाचे आहे, असे जर सर्वोच्च न्यायालय म्हणत आहे, तर मग भाजपच्या चवन्न्या आणि ‘बावन’ आण्यांना इतका थयथयाट करण्याचे कारण काय?”, असा हल्ला शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर चढवला.
फडतूस वाद : कमळाबाईच्या आरपार घुसला
“नपुंसक किंवा फडतूस शब्दांचा अर्थ या ‘बावन’ आण्यांनी समजून घेतला पाहिजे. शब्दकोश म्हणतो, ‘बिनकामाचे, निरर्थक म्हणजे फडतूस’, पण ‘फडतूस’ शब्द कमळाबाईच्या आरपार घुसला. सत्य हे असेच टोकदार असते. हे टोकदार सत्य फडतूस सरकारच्या काळजात घुसले आहे.”
“महाराष्ट्राची सध्या सर्वच बाजूंनी अधोगती सुरू आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा तर साफ मुडदा पडला आहे आणि ही भिजलेली काडतुसे आपल्याच मस्तीत दंग आहेत. या भिजलेल्या काडतुसांना संगीता डवरेंचे काय झाले याची माहिती होती काय? मंत्रालयासमोर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस पत्नी संगीता डवरे यांची अखेर मृत्यूशी झुंज मंगळवारी संपली. भिजलेल्या काडतुसाला आपण गृहमंत्री असल्याचा सार्थ अभिमान आहे, पण स्वपक्षीय बावनकुळे व डोम कावळे यांना अभिमान असणे व महाराष्ट्राला तुमच्या पदाचा आधार वाटणे यात जमीन-अस्मानाचा फरक आहे”, अशी शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.










