
जेव्हा राज्यात सत्तासंघर्ष झाला तेव्हा आम्हाला वाटलं होतं की देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री होतील. मात्र तसं झालं नाही. देवेंद्र फडणवीस यांनी सगळं राजकीय नाट्य घडवलं. एकनाथ शिंदे आणि आमदारांना सुरतला नेलं त्यानंतर गुवाहाटीला नेलं. आम्हाला वाटलं होतं की भाजप त्यांना मुख्यमंत्रीपद देईल पण त्यांना उपमुख्यमंत्री करून भाजपने त्यांच्यावर अन्याय केला त्यांना वेटिंग फॉर सीएम ठेवलं असं म्हणत जयंत पाटील यांनी विधानसभेत तुफान फटकेबाजी केली.
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिलं ते मनावर दगड ठेवून दिलं गेलं असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. तुम्ही आमच्या बाजून या, कुणाच्याही मनावर दगड न ठेवता तुम्हाला मुख्यमंत्रीपद द्यायची आमची तयारी आहे असं म्हणत जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदेंना सभागृहात ऑफरच दिली. जयंत पाटील यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.
राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आल्यापासून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सत्तासंघर्षाचा प्रश्न न्यायालयात गेला आहे. या सरकारची अवस्था काय झाली आहे माहित आहे का? ज्याला ८० टक्के गुण मिळाले त्याने २० टक्के मिळालेल्या पाठिंबा दिला. असं म्हणत जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली. तसंच एकनाथ शिंदेंना ही विनंती आहे की तुम्ही मुख्यमंत्री म्हणून निर्णय घेताना देवेंद्र फडणवीस यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्या. तुम्ही निर्णय घेता ते त्यांना माहित नसतात हे जर खरं असेल तर तुम्ही तुमचा कणखरपणा दाखवत आहात असाही टोला जयंत पाटील यांनी लगावला.
महाराष्ट्र विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सध्या गाजतं आहे. नवी विधेयकं आणि राज्याच्या समस्या या सगळ्यावर चर्चा होत असली तरीही या चर्चेदरम्यान महाविकास आघाडी शिंदे फडणवीस सरकारला अडचणीत आणू पाहते आहे. विरोधी बाकांवर बसणारे नेते हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ४० आमदारांना सातत्याने खिंडीत गाठत आहेत. दादा भुसे यांना कृषी मंत्री का केलं नाही? ते बिचारे आधी कृषी मंत्री होते असंही जयंत पाटील म्हणाले. त्यानंतर दादा भुसे यांनी उभं राहून आपणच ते पद नाकारल्याचं सांगितलं.
गुलाबराव एकटेच ध्रुवासारखे
गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणी पुरवठा मंत्रिपद होतं. संघर्षानंतरही त्यांच्याकडे ते कायम राहिलं. एकटे गुलाबराव हे ध्रुवासारखे त्यांच्या पदावर अढळ राहिले. बाकी सगळ्यांची पदं बदलली असाही टोला जयंत पाटील यांनी लगावला.