Tokyo Olympic Explainer : तिरंदाजीत दक्षिण कोरिया कसं गाजवतं एकहाती सत्ता? काय आहे त्यांच्या यशामागचं रहस्य?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

टोकिय़ो ऑलिम्पिक स्पर्धेत तिरंदाजी प्रकारात आतापर्यंत दक्षिण कोरियाच्या खेळाडूंनी वर्चस्व गाजवलं आहे. भारताकडून या स्पर्धेत प्रवीण जाधव, अतानू दास, दिपीका कुमारी, तरुणदीप रॉय हे खेळाडू सहभागी झाले होते. परंतू दिपीका कुमारी आणि अतानू दास यांच्या रुपाने भारताचं आव्हान या स्पर्धेत कायम राहिलं आहे. परंतू प्रत्येक प्रकारात दक्षिण कोरियाचे खेळाडू आपली छाप पाडत पदकांच्या दिशेने आगेकूच करत आहेत.

तिरंदाजीमध्ये दक्षिण कोरिया एकहाती सत्ता कशी गाजवतो याची एक छोटीशी झलक. २०१६ साली रिओ मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत दक्षिण कोरियाने महिला-पुरुष एकेरी, दुहेरी आणि मिश्र दुहेरी अशा चारही स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवलं होतं. ऑलिम्पिकच्या इतिहासात दक्षिण कोरियाने तिरंदाजी या खेळात ३९ पदकं मिळवली असून यापैकी २३ सुवर्णपदकं आहेत.

१९८८ साली Seoul ऑलिम्पिक स्पर्धेत महिला तिरंदाजीचा समावेश झाला. त्यावेळपासून आतापर्यंत कोरियाचा संघ Women’s Recurve च्या प्रकारात बाजी मारत आला आहे. त्यामुळे कोरिअन खेळाडूंमध्ये असं नेमकं काय आहे की तिरंदाजी खेळात ते आपल्या प्रतिस्पर्ध्याला फारशी संधीच देत नाहीत? जाणून घेऊयात…

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

१) प्राथमिक शिक्षणापासून तिरंदाजीवर दिला जातो भर –

ADVERTISEMENT

एखादा खेळ देशात घट्ट रुजवायचा असेल तर त्याची पाळमुळं खोलवर जाणं गरजेचं असतं. दक्षिण कोरियाने हे सूत्र ओळखलं आहे. दक्षिण कोरियात प्राथमिक शाळेपासून मुलांना तिरंदाजीचे धडे दिले जातात. कोरियाच्या बालवाडी शाळांमध्ये १४१, प्राथमिक शाळेत ९७ तर माध्यमिक शाळांमध्ये ५० क्लब आहेत की जिकडे विद्यार्थ्यांना तिरंदाजीचं शिक्षण दिलं जातं. इतकच नव्हे तर शाळेतील दोन तास हे तिरंदाजीच्या सरावासाठी राखीव असतात.

ADVERTISEMENT

विद्यार्थीदशेपासून प्रोफेशनल खेळाडू तयार करायचे आणि एखाद्या खेळाडूत विशेष गूण असतील तर त्याला राष्ट्रीय संघासाठी तयार करणं हे यामागचं उद्दीष्ट आहे. याच कारणामुळे दक्षिण कोरियाकडे तिरंदाजीत उत्तम कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंपासून अनुभवी खेळाडूंपर्यंतची मोठी फौज आहे. टोकियोत आतापर्यंत कोरियाच्या संघाने सुवर्णपदकाची कमाई केली असून यात एका १७ वर्षीय खेळाडूचा समावेश असून याच संघात एक तिशी पार केलेल्या खेळाडूचाही समावेश आहे.

२) कठोर परिश्रमांना पर्याय नाही –

दक्षिण कोरियातील तिरंदाजांचा सरावही तितकाच खडतर असतो. कोरियातले तिरंदाज हे दिवसाला दहा तास आणि आठवड्याला किमान अडीच हजार बाण मारायचा सराव करतात. या सरावात खेळादरम्यान मन स्थिर कसं ठेवायचं याचेही धडे गिरवले जातात. तसेच प्रत्येक वातावरणात खेळायचा सराव व्हावा यासाठी कोरियाच्या खेळाडूंनी बेसबॉल स्टेडीयममध्ये प्रेक्षकांच्या गोंगाटातही सराव केला आहे. यावरुन त्यांची खेळाप्रती असलेली निष्ठा तुमच्या लक्षात येईल. ज्या वर्षी ऑलिम्पिक स्पर्धा असेल त्या वर्षात कोरियाची राष्ट्रीय टीम ही कोणत्याही इनडोअर स्पर्धेत सहभागी होत नाही. कितीही खडतर वातावरणात हा संघ आपला सराव कायम सुरुच ठेवतो.

३) ७० च्या दशकात सुरु झालेल्या प्रयत्नांना मिळतंय यश –

कोरियाचा संघ तिरंदाजीत सध्या भरपूर यश मिळवतो आहे. पण हे यश एका महिन्याच्या किंवा एका वर्षाच्या सरावाने आलेलं नाही. १९७० सालात कोरियातील खेळाडू आणि प्रशिक्षकांनी भविष्याचा विचार करुन एक योजना आखली होती. या योजनेनुसार खेळाडूची शाररिक ठेवण लक्षात घेऊन कमी वजनाचे बाण तयार करायला सुरुवात झाली. तसेच सरावादरम्यान कोणत्याही खेळाडूला त्याच्या शरिराच्या ठेवणीमुळे माघार घ्यायला लागू नये यासाठी त्या प्रकारे नवीन पद्धती शोधून काढण्यात आल्या.

एखाद्या गोष्टीत प्रावीण्य मिळवायचं असेल तर त्यासाठी भरपूर सराव, दूरदृष्टी आणि प्रचंड मेहनत या गोष्टी आवश्यक असतात. दक्षिण कोरियाने तिरंदाजीची पाळंमुळं खोलवर रुजवण्यात यश मिळवलंय, आज ऑलिम्पिकमध्ये दिसणारं सोनेरी यश हे त्याचीच प्रचिती आहे.

Tokyo Olympic 2020 : दिपीका कुमारीच्या रुपाने तिरंदाजीत भारताचं आव्हान कायम

    follow whatsapp

    ADVERTISEMENT