IrshalWadi Landslide : ‘माझे तर सगळेच मेले’, वन विभागामुळे इर्शाळवाडी गेली मृत्यूच्या जबड्यात!

सौरभ वक्तानिया

20 Jul 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 02:27 PM)

इर्शाळवाडी येथे मोठी दरड गावावर कोसळल्याची घटना 19 जुलैला रात्री घडली. आतापर्यंत 16 जणांचे मृतदेह सापडले असून, पाऊस सुरू असल्याने मदत कार्यात व्यत्यय येत आहे.

Irshalwadi landslide updates : 16 deadbodies recovered from debris

Irshalwadi landslide updates : 16 deadbodies recovered from debris

follow google news

Irshalwadi Landslide latest News : ‘नवऱ्याकडले अन् माझ्याकडले… सगळेच मेलेत’, असं म्हणत त्या मायमाऊलींने हंबरडा फोडला आणि तिच्या अश्रुंनी इर्शाळगडाच्या पाषाणलाही गलबलून आलं. पिढ्यान् पिढ्या डोंगरच्या कुशीत राहणाऱ्या ठाकर या आदिवासी समुदायाच्या इर्शाळवाडीचा रात्रीच्या काळोखात मृत्यूने घास घेतला. इर्शाळवाडीत चिखलाखाली माणसं गाडली गेली. पण, ही सगळी माणसं वाचली असती, असं एका रहिवाशांना सांगितलं. वन विभागामुळे आमची माणसं गेली, असं सांगताना त्यांच्या अश्रुंचा बांध फुटला.

हे वाचलं का?

मुंबई Tak ने घटनेबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिथल्या स्थानिकांनी काय घडलं हे सांगितलं. एका रहिवाशांने मात्र, वन विभागामुळे माणसं मेल्याचा आरोप केला. इर्शाळवाडीतील माणसं इर्शाळगडाच्या कुशीत असलेल्या गावात का राहायला गेली, याची कहाणीच त्याने अश्रुंना वाट मोकळी करून देत सांगितली.

इर्शाळवाडी जमिनीखाली गेली असती, पण… माणसं वाचली असती

ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या आपल्या माणसांची वाट बघत असलेल्या एका रहिवाशाने सांगितलं की, “आमच्या लोकांना आधी सांगितलेलं… शासनाने आदेश दिलेले की तुम्ही तिथे राहू नका. बाहेर रहा. त्यामुळे पावसाचा धोका असल्यामुळे आमच्या लोकांनी दुसरीकडे वन विभागाच्या जागेत राहण्यासाठी झोपड्या बांधल्या होत्या. परंतु वन विभागाने सगळ्या झोपड्या मोडून टाकल्या. तीन-चार वेळा वन विभागाच्या लोकांनी मोडल्या. त्यामुळे ती लोक परत राहत्या घरी म्हणजे इर्शाळवाडी येथे असलेल्या घरीच गेले. त्याच्यामुळे ही घटना घडली.”

वाचा >> Kalyan: नाल्यात वाहून गेलेल्या ‘त्या’ बाळाचं नेमकं काय झालं?, 24 तास उलटले तरीही…

“मला वाटतं की, वन विभागाच्या लोकांवर 302 चा (हत्या) गुन्हा दाखल करावा आणि याची मुख्यमंत्र्यांनी (एकनाथ शिंदे) नोंद घ्यावी. कारण आमचे लोक तिथे राहिले असते… ज्या झोपड्या बांधल्या होत्या तिथे… तर हे लोक परत इर्शाळवाडीत राहायला गेले नसते आणि अशी घटना घडली नसती. आज ते सुरक्षित असते. याला पूर्णपणे जबाबदार वन विभागाचे लोक आहेत. आमच्या महिला भगिनी इथे रडताहेत. आमचे अश्रू पुसायला आज कुणी आलं नाही. आज आमच्या आदिवासी समाजाची एवढी मोठी हानी झाली. यांना लाज वाटायला पाहिजे होती फॉरेस्ट वाल्यांना… तुमची जागा काय विकत नेली असती का आम्ही? विकली असती का? पावसाळ्यापुरते राहिले असते, नंतर ते गेले असते ना राहायला”, असं सांगताना त्याच्या अश्रुंचा बांध फुटला.

वाचा >> Irshalwadi Landslide : …म्हणून इर्शाळवाडीवर कोसळली ‘मड फ्लो’ दरड!

‘मी, नवरा आणि दोन पोरीचं राहिल्या’

दरडीमुळे मोठा आघात झालेल्या महिलेने रात्रीची आपबीती सांगताना टाहो फोडला. “माझे तर सगळेच मेले, नवऱ्याकडलेही मेले आणि माझ्याही घरचे मेले. आम्हीच राहिलो मागे… दोन पोरी आणि आम्ही दोघं. कुणीच नाही राहिलं. घरीच होतो. बसलो होतो. आमचं घर राहीलं आहे. आम्हाला वाटलं वरून काहीतरी गेलं.”

“आमच्या धन्याला बोललो वरतून काहीतरी गेलं. पाऊस होता. त्यामुळे ऐकू नाही आलं. दगडी गळगळी आले म्हणून… ती सगळी माती सरपटीत आली. एक माणूस होता, ज्यांचं घरं बुजलेलं. तो आवाज देत होता, रडत होता. काढायला या… काढायला या म्हणत होता. आम्ही धावत गेलो. माझी पोरं घरी होती. मला वाटलं की एकच घरं मोडलं. आम्ही गेलो, तिकडे वाट भेटत नव्हती. गावात गेलो, तर तिकडे वाट भेटत नव्हती. आमच्या मुलांना सांगितलं निघा. मुलाचे जीव वाचावेत म्हणून प्रयत्न केले”, असं सांगत महिला आक्रोश करत होती.

    follow whatsapp