Kalyan News, कल्याण : कल्याणजवळील मोहने-गाळेगाव परिसरात भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू झालाय. दरम्यान, त्याला वाचवण्यासाठी धावलेल्या त्याच्या मित्रालाही भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाबाबत पुन्हा एकदा संताप व्यक्त होत आहे. मृत मुलाचे नाव खुशील शंकर वाघे असे असून तो परिसरातील कातकरी पाड्यात आपल्या कुटुंबासोबत राहत होता.
ADVERTISEMENT
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, खुशील घराजवळ खेळत असताना एका भटक्या कुत्र्याने त्याच्यावर हल्ला करून चावा घेतला. त्याच्या आरडाओरडीनंतर त्याचा सात वर्षीय मित्र निलेश बागले त्याला वाचवण्यासाठी धावला. मात्र त्या कुत्र्याने निलेशलाही चावा घेतला. दोन्ही मुलांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान खुशीलचा मृत्यू झाला, तर निलेशवर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
खुशीलचे आई-वडील मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या मुलाच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. स्थानिकांच्या मते, या भागात भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढले असून वारंवार हल्ल्याच्या घटना घडत आहेत.
दरम्यान, कल्याण पूर्वेत अलीकडेच एका 30 वर्षीय बँक कर्मचाऱ्याने कुत्र्याने चावल्यानंतर रेबीजची भीती वाटून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्या पार्श्वभूमीवर ही घटना अधिकच गंभीर मानली जात आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नगरसेविका तेजश्री गायकवाड आणि नगरसेवक उमेश बोरगावकर यांनी या प्रकरणाची दखल घेत कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) मुख्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेतली. बल्याणी चौक, उंभार्णी, मोहिली, गाळेगाव, जेतवननगर, तिपन्नानगर, आर. एस. टेकडी आणि मोहने परिसरात भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी विशेष पथक तैनात करावे, निर्बीजीकरण मोहीम आणि लसीकरण अधिक प्रभावीपणे राबवावे, अशी मागणी त्यांनी केली. महापालिका प्रशासनाच्या माहितीनुसार 2024 ते 2025 या कालावधीत 20 हजार 193 कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले आहे. मात्र माहिती अधिकार कार्यकर्ते मनोज कुलकर्णी यांनी या प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप केला असून नव्या कंत्राटदारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नागरिकांनी आता तरी महापालिकेने ठोस उपाययोजना करून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











