Dr. Sangram Patil News : सोशल मीडियावर भाजपविरोधात सडेतोड भूमिका घेणारे ब्रिटनस्थित डॉ. संग्राम पाटील हे सध्या कुठे आहेत, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याविषयी फेसबुकवर पोस्ट करुन पाटील यांनी माहिती दिली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलंय की, 'ते सध्या भारतातच आहेत आणि त्यांच्याविरुद्ध मुंबई पोलिसांनी जारी केलेले लुक आऊट सर्क्युलर अजूनही रद्द करण्यात आलेले नाही.' हे लुकआऊट सर्क्युलर रद्द व्हावे यासाठी मुंबई हायकर्टात धाव घेतल्याची माहितीही पाटील यांनी दिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी नेमकं काय म्हटलंय, जाणून घेऊया.
ADVERTISEMENT
डॉ. संग्राम पाटील यांची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी
'मी सध्या कुठे आहे? भारतातच की इंग्लंडला परतलो?' असा प्रश्न अनेक मित्र आणि हितचिंतकांना पडलेला आहे. अशा सर्व जणांना माहिती देणे हे माझे कर्तव्य म्हणून मी ही अपडेट देत आहे.
मी 10 जानेवारी पासून भारतातच आहे. माझ्या विरोधात मुंबई पोलिसांनी लावलेले Look out circular (LOC) अजूनही रद्द केलेले नसल्याने मला घरी युकेला परत जाता आलेले नाही. या प्रकरणी मी माननीय उच्च न्यायालय, मुंबई येथे 20 जानेवारी 2026 रोजी याचिका दाखल केलेली आहे. त्यात माझ्यावर पोलिसांनी केलेली कारवाई आणि लावलेले कलम अयोग्य असून सदर गुन्हा रद्द करून Look Out Circular सुद्धा रद्द करावे अशी प्रार्थना केलेली आहे.
सदर प्रकरणी सुनावणी सुरू असून माझ्या वकिलांमार्फत माननीय उच्च न्यायालयात माझी बाजू व्यवस्थित मांडलेली आहे, सरकार पक्षाने मुंबई पोलिसांची बाजू मांडली आहे. माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मी प्रतिज्ञापत्र सादर करून माझे म्हणणे लिखित स्वरूपात मुद्देसूदपणे सविस्तर मांडलेले आहेत व मला न्याय मिळावा यासाठी माननीय उच्च न्यायालयास विनंती केली आहे.
सदर प्रकरणी पुढील सुनावणी 15 एप्रिल रोजी ठेवण्यात आलेली आहे. त्या दिवशीच्या सुनावणीत मला माननीय न्यायालयाकडून न्याय मिळेल अशी मला आशा आहे. संविधान आणि न्यायव्यवस्था यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे.
हे ही वाचा : मुंबईची खबर : आता महापालिकेच्या रुग्णालयातही मिळणार आयव्हीएफ उपचार, लवकरच अंतिम निर्णय
10 जानेवारीपासून भारतातच
10 जानेवारी रोजी डॉ. संग्राम पाटील हे आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी भारतात आले होते. त्यानंतर एका सायबर गुन्ह्यात मुंबई पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. तेव्हापासून ते भारतातच आहेत. लंडनला परत जाता यावे यासाठी त्यांनी मुंबई हाय कोर्टात धाव घेतली आहे. याविषयी 15 एप्रिल रोजी होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
ADVERTISEMENT











