'माझे घर धोक्यात... ते वाचवा', अभिनेता किशोर कदमांची 'ती' Facebook पोस्ट प्रचंड Viral

Kishor Kadam: दिग्गज अभिनेते किशोर कदम यांनी मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पांमधील गैरप्रकार आणि सामान्य माणसांना येणाऱ्या अडचणींवर प्रकाश टाकला आहे. त्यांच्या घराला धोका निर्माण झाल्याने आणि सोसायटी कमिटी व बिल्डरच्या कथित फसवणुकीमुळे त्यांनी सरकारकडे मदत मागितली आहे.

my house is in danger save it actor kishore kadam facebook post goes viral

किशोर कदमांची फेसबुक पोस्ट व्हायरल (फोटो सौजन्य: Instagram)

मुंबई तक

• 06:33 AM • 12 Aug 2025

follow google news

मुंबई: मराठी आणि हिंदी रंगभूमी, चित्रपटसृष्टी तसेच कवितेच्या क्षेत्रात आपल्या उत्तम अभिनयाने आणि 'सौमित्र' या नावाने परिचीत असलेले अभिनेते व कवी किशोर कदम सध्या मोठ्या संकटात सापडले आहेत. त्यांनी मुंबईतील अंधेरी (पूर्व) येथील चकाला परिसरात असलेल्या त्यांच्या राहत्या घराला धोका निर्माण झाल्याची व्यथा सोशल मीडियावर शेअर केली आहे. फेसबुकवर एका भावनिक पोस्टद्वारे त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह सहकारमंत्री आणि महाराष्ट्रातील जनतेला मदतीचे आवाहन केले आहे.

हे वाचलं का?

काय आहे प्रकरण?

किशोर कदम यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, त्यांच्या अंधेरी हवा मेहेल सोसायटी (चकाला, मुंबई 400093) मधील पुनर्विकास प्रक्रियेत प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट (PMC) आणि बिल्डर यांनी संगनमताने सोसायटीच्या काही कमिटी सदस्यांना दिशाभूल करून त्यांचे आणि इतर 23 सभासदांचे राहते घर धोक्यात आणले आहे. त्यांच्या मते, सोसायटी कमिटीने महत्त्वाची कागदपत्रे लपवून, अपुरी माहिती देऊन आणि दिशाभूल करून चकाला सारख्या प्राइम लोकेशनमधील त्यांच्या इमारतीला DCPR 33(11) आणि 33(12)B अंतर्गत SRA (स्लम रिहॅबिलिटेशन ऑथॉरिटी) किंवा स्लम डेव्हलपमेंट योजनेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.

किशोर कदम यांनी नमूद केले की, हा प्रकार त्यांना आणि इतर सभासदांना नुकताच समजला. त्यांच्या मते, कमिटी जर सभासदांच्या हिताचा विचार न करता बिल्डर आणि PMC च्या चुकीच्या प्रभावाखाली काम करत असेल, तर सामान्य माणसांची घरे ट्रान्झिट कॅम्पसारखी होण्याची शक्यता निर्माण होते. “अंधेरी हवा मेहेल सोसायटी हे त्याचे जिवंत उदाहरण आहे,” असे त्यांनी संतापाने लिहिले आहे.

कमिटी आणि बिल्डरवर गंभीर आरोप

किशोर कदम यांनी आपल्या पोस्टमध्ये सोसायटी कमिटी आणि बिल्डरवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, बहुमताच्या (मेजॉरिटी) नावाखाली काही कमिटी सदस्यांनी त्यांच्यासह इतर सभासदांना विश्वासात न घेता निर्णय घेतले. जे सभासद कायदेशीर प्रश्न विचारतात किंवा चुकीकडे बोट दाखवतात, त्यांना सोसायटीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधून बाहेर काढले जाते, त्यांच्यापासून महत्त्वाची माहिती लपवली जाते आणि त्यांना रिडेव्हलपमेंटच्या विरोधी असल्याची चुकीची प्रतिमा निर्माण करून एकटे पाडले जाते. कदम यांनी याला “शहरी अत्याचार” (urban atrocity) संबोधले असून, यासाठी कायद्यात कोणतीही तरतूद नसल्याची खंत व्यक्त केली आहे.

ते पुढे म्हणाले की, बिल्डर आणि PMC यांच्या प्रचंड आर्थिक ताकदीसमोर सामान्य माणसाला वर्षानुवर्षे लढावे लागते, आणि अशा अनेक केसेस मुंबईत प्रलंबित आहेत. त्यांनी सरकारने बनवलेल्या बहुमताच्या कायद्यावरही टीका केली, ज्यामुळे कायदेशीर आणि जागरूक सभासदांचा आवाज दडपला जातो. “मूर्खांच्या मेजॉरिटीचा गैरफायदा घेतला जातो, आणि स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणाऱ्यांना त्याची जाणीवही होत नाही,” असे त्यांनी लिहिले.

मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती

किशोर कदम यांनी आपल्या पोस्टच्या शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांना तातडीने या समस्येकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे. “एका कलावंताचे घर वाचवण्याचे आवाहन मी महाराष्ट्रातील तमाम रसिक जनतेला आणि सरकारला करीत आहे,” असे त्यांनी भावनिक आवाहन केले. त्यांनी आपली ओळख सौमित्र या कवी नावाने आणि मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील 30-35 वर्षांच्या कारकिर्दीचा उल्लेख करत, आपल्या पुरस्कारांचाही उल्लेख केला.

सोसायटीतील शहरी अत्याचार

कदम यांनी आपल्या पोस्टमध्ये एका गंभीर मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे की, जागरूक सभासदांना सोसायटीच्या कमिटीद्वारे जाणीवपूर्वक लक्ष्य केले जाते. त्यांना व्हॉट्सअॅप ग्रुपमधून काढून टाकणे, माहिती लपवणे, आणि इतर सभासदांना त्यांच्याविरुद्ध भडकवणे यासारख्या प्रकारांना त्यांनी “शहरी अत्याचार” संबोधले आहे. अशा प्रकरणांविरुद्ध कायद्यात कोणतीही स्पष्ट तरतूद नसल्याने सामान्य माणसाला हतबल होऊन लढावे लागते, असे त्यांनी नमूद केले.

किशोर कदम यांची कारकीर्द

किशोर कदम हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक सुप्रसिद्ध नाव आहे. ‘नटरंग’, ‘फॅन्ड्री’, ‘जोगवा’, ‘जारण’ यासारख्या चित्रपटांमधील त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘जारण’ चित्रपटात त्यांनी डॉक्टरची भूमिका साकारली आहे, तर ‘अंधार माया’ या मराठी हॉरर वेब सीरिजमधील त्यांची भूमिका देखील गाजत आहे. कवी सौमित्र म्हणून त्यांच्या कवितांनीही रसिकांच्या मनात स्थान मिळवले आहे.

सोशल मीडियावर चर्चा

किशोर कदम यांच्या या पोस्टने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. अनेकांनी त्यांच्या समस्येला पाठिंबा दर्शवला असून, सरकारने याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे.


 

    follow whatsapp