मुंबई : राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे (वय 28) हिने शनिवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली . अवघ्या नऊ महिन्यांपूर्वी अनंत आणि गौरी यांचा मोठ्या थाटामाटात विवाह झाला होता. मात्र पतीच्या अनैतिक संबंधांमुळे निर्माण झालेल्या वादातून गौरीने हे टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. यानंतर वरळी पोलिसांनी रविवारी अनंतच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
पत्नीच्या आत्महत्येनंतर अनंत गर्जे दिनांक 24 रोजी मध्यरात्री वरळी पोलिस स्थानकात हजर झाला. कायद्याची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि न्याय्य रितीने पार पडावी, यासाठी अनंत गर्जे स्वखुशीने पोलिसांना सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. तपासाला सहकार्य करण्यासाठी त्यांनी स्वतःहून पोलिसांसमोर हजर होण्याचा निर्णय घेतला. या संपूर्ण प्रकरणाचा निष्पक्ष तपास व्हावा आणि सत्य जनसमोर यावे, यासाठी तपास यंत्रणांना आवश्यक ती सर्व माहिती आणि मदत करायला तयार आहे, असं अनंत गर्जे याने म्हटलंय.
मूळच्या बीड जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या गौरीचे वडील अशोक पालवे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ते वैद्यकीय योग प्रशिक्षक असून तिची आई परिचारिका आहे. बीडीएसचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर गौरीने सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये डेन्टल असिस्टंट म्हणून नोकरी केली होती. त्यानंतर सायन हॉस्पिटलमध्ये ती डेन्टल सर्जन म्हणून कार्यरत होती.
कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, अनंत किरकोळ कारणांवरून वाद घालत असे. पतीचे बाहेर असलेले संबंध तिला मानसिकरीत्या त्रस्त करत होते. यावर्षी 7 फेब्रुवारी रोजी त्यांच्या विवाह सोहळ्याला पंकजा मुंडे यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या होत्या. लग्नानंतर दोघेही नोकरीच्या कारणास्तव वरळीत राहत होते; मात्र काही दिवसांतच त्यांच्या नात्यात मतभेद वाढू लागले. शुक्रवारी रात्री सव्वादहा वाजता अनंतचे दोन मिस कॉल गौरीच्या वडिलांच्या मोबाईलवर आले. पुन्हा कॉल केल्यावर अनंतने प्रतिसाद दिला नाही. नंतर गौरीशी संपर्क साधला असता तिने सर्व काही ठीक असल्याचे सांगितले. मात्र, शनिवारी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास अनंतने वडिलांना फोन करून, “गौरी सुसाइड करतेय, तिला समजवा,” असे सांगितले. वडिलांनी गौरीशी बोलण्यास सांगितले असता अनंतने फोन देण्यास नकार देत तिला हॉस्पिटलमध्ये नेत असल्याचे सांगितले आणि कॉल कट केला.
आत्महत्या की हत्या? कुटुंबीयांचा संशय
गौरीचे मामा शिवदास गर्जे यांनी गंभीर आरोप करताना सांगितले की, अनंतच्या वागणुकीमुळेच गौरी तणावाखाली होती. काही महिन्यांपासून दोघांत वाद सुरू होते. त्याचे दुसरीकडे संबंध असल्याचे तिला समजले होते. तिने त्याला क्षमा केले तरी तो पुन्हा एका चॅटमध्ये गुंतलेला दिसल्याने ती पूर्णपणे खचली होती. “तो म्हणतो तिने गळफास घेतला, मग तिला थांबवले का नाही? जर ती आत्महत्या करत होती तर तो पळून का गेला?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ही आत्महत्या नसून हत्या असल्याची शंका कुटुंबीयांनी व्यक्त केली असून प्रकरणाचा सखोल तपास व्हावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











