रत्नागिरी : मुल होत नसल्याने नैराश्यात, विवाहितेने उंदीर मारण्याचं औषध पिऊन आयुष्य संपवलं

Ratnagiri Crime : मिळालेल्या माहितीनुसार, जयश्री मोहिते यांचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. विवाहानंतर बराच कालावधी उलटूनही त्यांना मुल होत नव्हतं. याच कारणामुळे त्या मानसिकदृष्ट्या तणावाखाली असल्याचं त्यांच्या जवळच्या नातेवाईकांकडून सांगण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या अधिकच शांत, चिंतेत आणि अस्वस्थ दिसत होत्या, अशी माहितीही समोर आली आहे.

Ratnagiri Crime

Ratnagiri Crime

मुंबई तक

30 Dec 2025 (अपडेटेड: 30 Dec 2025, 12:00 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

रत्नागिरी : मुल होत नसल्याने विवाहिता नैराश्यात

point

विवाहितेने उंदीर मारण्याचं औषध पिऊन आयुष्य संपवलं

चिपळूण (जि. रत्नागिरी) : तालुक्यातील आकले गावात एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी उघडकीस आली. मूल होत नसल्याच्या मानसिक तणावातून या महिलेने उंदीर मारण्याचं औषध प्राशन केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. जयश्री विजय मोहिते (वय 27, रा. आकले) असं मृत विवाहितेचं नाव आहे.

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, जयश्री मोहिते यांचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. विवाहानंतर बराच कालावधी उलटूनही त्यांना मुल होत नव्हतं. याच कारणामुळे त्या मानसिकदृष्ट्या तणावाखाली असल्याचं त्यांच्या जवळच्या नातेवाईकांकडून सांगण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या अधिकच शांत, चिंतेत आणि अस्वस्थ दिसत होत्या, अशी माहितीही समोर आली आहे.

गुरुवारी सकाळच्या सुमारास जयश्री यांनी घरात कुणाच्याही लक्षात न येता उंदीर मारण्याचं औषध प्राशन केलं. काही वेळानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडू लागल्याने कुटुंबीयांनी तातडीने त्यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या घटनेने मोहिते कुटुंबावर शोककळा पसरली असून संपूर्ण आकले गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच अलोरे-शिरगाव पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जयश्री यांच्या मृत्यूची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात कोणताही संशयास्पद प्रकार आढळून आलेला नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. मात्र, मृत्यूमागील नेमकं कारण स्पष्ट होण्यासाठी पुढील तपास सुरू असल्याचंही पोलिसांनी सांगितलं.

या घटनेनंतर सामाजिक स्तरावरही संवेदनशील चर्चा सुरू झाली आहे. अपत्यप्राप्ती न होणं ही वैद्यकीय बाब असून त्यातून येणारा मानसिक ताण अनेक महिलांसाठी गंभीर ठरतो, असं मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. योग्य समुपदेशन, कुटुंबाचा आधार आणि वैद्यकीय मार्गदर्शन मिळाल्यास अशा टोकाच्या निर्णयांना आळा घालता येऊ शकतो, असंही जाणकारांचं म्हणणं आहे. दरम्यान, जयश्री मोहिते यांच्या पश्चात पती, सासरची मंडळी आणि माहेरचे कुटुंबीय असा परिवार आहे. त्यांच्या अकाली जाण्याने दोन्ही कुटुंबांमध्ये शोककळा पसरलीये. या प्रकरणाचा पुढील तपास अलोरे-शिरगाव पोलिसांकडून सुरू असून अहवालानंतर अधिक माहिती स्पष्ट होणार आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

MNS Candidate list: मध्यरात्री मोठी घडामोड, BMC साठी मनसेची पहिली यादी आली समोर.. पाहा कोणाला मिळालं तिकीट

    follow whatsapp