Shiv sena UBT : “अदानींनी मिंधे, पवारांसह पन्नासएक आमदार-खासदारांना…”

भागवत हिरेकर

18 Dec 2023 (अपडेटेड: 18 Dec 2023, 03:04 AM)

uddhav thackeray dharavi redevelopment project : अदाणींना मिळालेल्या धारावी पुनर्वसन प्रकल्पावरून उद्धव ठाकरे आक्रमक झालेत. सामना अग्रलेखातून विरोधाची भूमिका स्पष्ट करताना उद्धव ठाकरे यांनी मोदी-शाह, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना सवाल केले आहेत. वाचा नेमकं काय म्हटलं आहे.

uddhav Thackeray's shiv sena attacked Shinde-Fadnavis-Pawar Government over dharavi redevelopment project

uddhav Thackeray's shiv sena attacked Shinde-Fadnavis-Pawar Government over dharavi redevelopment project

follow google news

Uddhav Thackeray on Dharavi Redevelopment Project : धारावी पुनर्वसन प्रकल्पाला काँग्रेससह शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विरोध सुरू केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आल्यानंतर भाजपकडून थेट उद्धव ठाकरेंना लक्ष्य करण्यात आले. भाजपकडून झालेल्या या हल्ल्याला सामना अग्रलेखातून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. यात राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवरही अप्रत्यक्षपणे बाण डागले आहेत.

हे वाचलं का?

धारावी पुनर्वसन प्रकल्प, अदाणी आणि शिंदे-भाजपला सवाल… अग्रलेखात काय?

“गौतम अदानी यांच्याशी भारतीय जनता पक्षाचे नेमके नाते काय हे त्यांनी एकदा जाहीर केले पाहिजे. या नात्याविषयी लोकांच्या मनात शंका आणि संभ्रम आहे. हे नाते नैतिक की अनैतिक यावरही खुलासा व्हायला हवा. हे महाशय टाटा, बिर्ला, बजाज, अझिझ प्रेमजी, नारायण मूर्ती नाहीत. उद्योगपती व शेठजी यात फरक आहे.”

– “अदानी हे मोदीकृत भाजपचे नाजूक जागेचे दुखणे असावे हे तर नक्कीच. कारण विरोधकांनी अदानी यांच्या एखाद्या उपद्व्यापाबाबत प्रश्न उपस्थित करताच भाजपचे तांडव सुरू होते. त्यांच्या अंगात आग्यावेताळ संचारतो व प्रश्नकर्त्यांच्या अंगावर ते हमरीतुमरी करत धावून जातात. हेच आता धारावी पुनर्वसन प्रकल्पाबाबतीतही दिसून आले.”

– “धारावी पुनर्वसन विकासकामाचे ‘टेंडर’ अदानी यांच्या कंपनीने मिळवले आहे. आशियामधील सगळ्यात मोठ्या घनदाट झोपडपट्टीचा विकास होत असेल व गोरगरीबांना त्यांच्या हक्काची घरे मिळणार असतील तर त्यास कोण विरोध करेल? विरोधाचा प्रश्नच उद्भवत नाही. पण साधारण सहाशे एकरांचा भूखंड अदानी यांच्या आधीच फुगलेल्या खिशात घालताना मिंधे-फडणवीस सरकारने अदानींशी एक प्रकारे ‘मुंबई’चाच सौदा केला. धारावी विकासाच्या नावाखाली संपूर्ण मुंबईच ‘हुंडा’ म्हणून या भाजपच्या जावयास देण्याचा घाट घातला.”

“अदानींचे भाजपशी नाते काय आहे?”

– “अदानींना मुंबई गिळू देणार नाही असा दम भरताच भाजपवाले अदानींचे वकील म्हणून भांडण्यास उभे राहिले. त्यामुळेच प्रश्न पडला अदानींचे भाजपशी नाते काय आहे? धारावीतील साधारण बारा लाख लोकांना घरे मिळावीत, पण त्यातील नागरिकांना पात्र-अपात्र ठरविण्याचा अधिकार पूर्णपणे अदानींचा आहे. 300 चौरस फुटांचे घर अदानी देणार, पण त्यांना 500 चौरस फुटांचे घर मिळायला हवे. धारावीत गार्मेंट, चर्मोद्योग, प्लॅस्टिक, कुंभारकामाचे उद्योग आहेत. हे तसे लघुउद्योग आहेत. खाद्यपदार्थ, पापड-लोणची बनवणाऱ्या महिलांचे गट तेथे काम करतात. त्या सगळय़ांच्या व्यवसायांना ते आहेत तेथेच जागा मिळायला हव्यात ही मागणी न्याय्य आहे व या मागणीबद्दल आवाज उठवताच भाजप आणि त्यांचे मिंधे लोक अदानींचा जयजयकार करीत तांडव करीत आहेत.”

हेही वाचा >> ‘OBC विरोधात बोलणाऱ्यांचा…’, छगन भुजबळांचा थेट इशारा

– “या प्रकल्पातून अदानींना किमान एक लाख कोटींचा फायदा होईल. कारण धारावी ही धारावी नसून बीकेसी म्हणजे सगळ्यात महागड्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सचाच विस्तारित भाग होईल व धारावीच्या जमिनीला देशात सर्वोच्च भाव मिळेल. पुन्हा धारावीच्या निमित्ताने सरकारने अदानींवर सवलती व करमाफीचा वर्षाव केला आहे. जणू काही धारावी प्रकल्पाचे काम ते फुकटात किंवा धर्मादाय पद्धतीने करणार आहेत.”

– “टीडीआर’ धारावीतल्या गटारापासून जिन्याखालच्या जमिनीचा मिळेल व कोटीकोटींचा हा ‘टीडीआर’ अदानी मुंबईत कोठेही वापरू शकतात आणि हव्या त्या भावात विकून मुंबईतील घरांच्या किमतीवर नियंत्रण ठेवू शकतात. हा ‘टीडीआर’ घोटाळा धक्कादायक आहे. धारावीच्या पुनर्वसनाच्या नावाखाली वडाळ्याच्या तसेच कांजुरमार्गच्या मिठागराची जमीनही अदानी यांच्या घशात जात आहे. देवनार कत्तलखान्याची 300 एकर जमीन अदानी यांनाच देण्याचा घाट घातला आहे.”

“मुंबईचा सातबारा भाजपच्या जावयाच्या नावावर करण्याचे कारस्थान”

– “मुंबईतील अभ्युदयनगर, वरळीच्या आदर्शनगरचे शेकडो एकरांचे भूखंड विकासाच्या नावाखाली अदानी यांनी आधीच कब्जात घेतले आहेत. उद्या रेसकोर्स, शिवतीर्थ, कामगार मैदानसुद्धा त्यांच्या खिशात कोंबले जाईल. एक प्रकारे मुंबईचा सातबारा भाजपच्या जावयाच्या नावावर करण्याचे हे कुटिल कारस्थान असून शिवसेना मुंबईची ही लूट उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही.”

हेही वाचा >> अदाणींमुळे मविआ सरकार पडलं?, उद्धव ठाकरेंचा प्रचंड मोठा गौप्यस्फोट

– “मराठी पाट्यांवर आंदोलन करणाऱ्या, टोलवर तोडफोड करणाऱ्या व त्यानिमित्त मराठीचा गजर करणाऱ्या पक्ष व संघटना येथे पायलीला पन्नास आहेत, पण या सगळ्यांच्या तोंडास अदानींनी आता बूच मारले आहे. धारावी प्रकल्पातील अदानी भ्रष्टाचाराविरोधात शिवसेना, काँग्रेस, डावे, राष्ट्रवादी काँग्रेसवाले एकवटले. प्रचंड मोर्चा निघाला तेव्हा सगळ्यांनाच संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आठवण झाली.”

– “संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा प्रामुख्याने मुंबईसाठीचा लढा होता. उपऱ्यांना मुंबईची लूट करायची होती व त्यासाठी त्यांना महाराष्ट्रातून मुंबई वेगळी करायची होती. मुंबईला भांडवलदारांच्या पायाची दासी बनवून तिचे वस्त्रहरण करायचे होते. त्याविरुद्ध मराठा एकवटला व मुंबईचे रक्षण झाले. त्या लढ्यात भाजप किंवा जनसंघ कोठेच नव्हता. मात्र मुंबईच्या मलिद्यावर ताव मारणारी शेठगिरी करण्यात ते सदैव पुढेच आहेत.”

हेही वाचा >> ‘…ते सगळं दुखणं दूर करणार’, पवारांनी पुन्हा ठणकावून सांगितलं

– “अदानींचा इतका पुळका या लोकांना का? मोदी-शाहांच्या भाजप सरकारने देशाची सार्वजनिक संपत्ती विकायला काढली व ती विकत घेणारे एकमेव नाव म्हणजे अदानी. विमानतळे, सार्वजनिक उपक्रम, बंदरे, रस्ते, सरकारी जमिनी, वृत्तसंस्था या सगळ्यांवर भाजपपुरस्कृत भांडवलदार अदानी यांनी कब्जा मिळवला आहे. त्यात आता धारावी झोपडपट्टीची भर पडली.”

“प्रश्न विचारणे हा आपल्या देशात गुन्हा”

– “दिल्लीत दोघे विकायला बसलेत व तो माल दोघे खरेदी करतात. त्यात अदानी यांचा वाटा मोठा आहे. यावर कोणी आवाज उठवला की, भारतीय जनता पक्षाला मिरच्या झोंबतात व ते सगळे ताडताड उडतात. अदानी यांच्या उपद्व्यापावर प्रश्न विचारणे हा आपल्या देशात गुन्हा ठरला आहे.”

– “तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी संसदेत सातत्याने अदानी यांच्या कारनाम्यावर प्रश्न विचारले. त्यामुळे भाजप इतकी खवळली की, येनकेनप्रकारेण त्यांनी महुआ यांना संसदेतूनच बाहेर फेकून दिले. आता धारावीवर प्रश्न विचारणाऱ्यांना भाजपवाले सुळावर चढवतात की, फासावर लटकवतात तेच पाहायला हवे. पण धारावीची जनता लढाऊ बाण्याची आहे. धारावीचा लढा हा मुंबई वाचविण्याचा लढा आहे.”

हेही वाचा >> शिंदे सरकारला जरांगेंचा स्पष्ट ‘मेसेज’; म्हणाले “देव सुद्धा मराठ्यांना…”

– “भांडवलदारांच्या छातीवर पाय ठेवून मुंबई महाराष्ट्रात सामील करून घेतली ती मुंबई पुन्हा भांडवलदारांची दासी कदापि होऊ देणार नाही. हा मराठी बाणा कायम आहे. ‘मुंबई’ दासी व्हावी म्हणून अदानी यांनी एकनाथ मिंधे, अजित पवार यांच्यासह पन्नासएक आमदार-खासदारांना आधी पायाचे दास किंवा पायपुसणे करून घेतले. पण तरीही लाखोंचा मोर्चा धारावी-मुंबई वाचविण्यासाठी निघाला. यात भाजपच्या बेंबीत विंचवाने डंख मारावा असे काय आहे? लढाई अदानींविरुद्ध आहे, घायाळ भाजप झाला आहे. भाजपची जान अदानींच्या पोपटात आहे काय?”

    follow whatsapp