Mumbai News : मुंबई आणि नवी मुंबईतील वाढती लोकसंख्या तसेच वाहतूक कोंडीचा ताण कमी करण्यासाठी आता 'मुंबई 3.0' हे नवीन शहर उभारण्याची तयारी वेगाने सुरू झाली आहे. रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल आणि पेण तालुक्यातील 124 गावांचा समावेश करून सुमारे 323.44 वर्ग किलोमीटर क्षेत्रावर हे नवीन शहर विकसित केले जाणार आहे. या क्षेत्राला 'कर्नाळा-साई-चिरनेर' (KSC) न्यू टाउन म्हणूनही ओळखले जाईल. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) या संपूर्ण प्रकल्पाचा मास्टर प्लॅन आणि व्हिजन तयार करण्याची जबाबदारी सिंगापूरच्या प्रसिद्ध 'सुरबाना जुराँग' या कंपनीकडे सोपवली असून, या क्षेत्रातील जमीन अधिग्रहणाची प्रक्रियाही आता सुरू झाली आहे.
ADVERTISEMENT
मुंबई 3.0 मध्ये काय असणार?
या नवीन शहराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे मोक्याचे ठिकाण होय. हा संपूर्ण भाग अटल सेतू (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक) आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अगदी जवळ आहे. मेट्रो, लोकल ट्रेन, एक्सप्रेसवे आणि विमानतळाशी थेट कनेक्टिव्हिटी असणार असल्याने येथे वाहतूक अत्यंत सुलभ आणि गतिमान राहील. राज्य सरकारच्या योजनेनुसार या परिसरात मोठे व्यावसायिक क्षेत्र (कमर्शियल झोन), लॉजिस्टिक पार्क, आयटी सेंटर, मोठी रुग्णालये आणि जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संस्था उभारल्या जाणार आहेत.
हे ही वाचा : दुकानात काम करणाऱ्या अल्पवयीन मुलावर बलात्कार, भाजी विक्रेता फरार
प्रकल्पग्रस्तांसाठी विविध पर्याय
प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आणि घरमालकांसाठी प्रशासनाने विविध सवलती व पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. जमीन मालक थेट रोख मोबदला निवडू शकतात किंवा एफएसआय (FSI) आणि टीडीआर (TDR) चा पर्याय स्वीकारू शकतात. याव्यतिरिक्त 'लँड पुलिंग'ची पद्धतही लागू करण्यात आली आहे, ज्याअंतर्गत विकसित केलेल्या नवीन जमिनीचा एक निश्चित भाग मूळ जमीन मालकांना परत दिला जाईल, ज्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आर्थिक हिताचे संरक्षण होईल.
हे ही वाचा : 'तू माझ्या बायकोशी का बोलतोस,' म्हणत नवऱ्याने तरुणावर कुऱ्हाडीने हल्ला करत संपवलं
भविष्यातील सक्षम पर्याय
मुंबई आणि नवी मुंबईत आता जागेची मर्यादा स्पष्टपणे जाणवू लागली आहे. अशा परिस्थितीत 'मुंबई 3.0' हे शहर भविष्यातील आर्थिक व नागरी गरजा पूर्ण करण्यासाठी एक सक्षम पर्याय ठरेल. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा, संशोधन केंद्रे आणि बड्या टेक कंपन्यांच्या आगमनामुळे या भागात लाखो तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. तसेच नागरिकांसाठी उच्च दर्जाची गृहसंकुले उपलब्ध होऊन संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्राच्या विकासाला एक नवी दिशा मिळेल.
ADVERTISEMENT












