Crime News : एका तरुणाची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. 24 वर्षीय शिवकुमार आपल्या पत्नी आकांक्षाला पोलीस भरती परीक्षेसाठी घेऊन इंटर कॉलेजमध्ये आला होता. परीक्षा संपल्यानंतर, आकांक्षा आपल्या पतीसोबत स्कॉर्पिओ गाडीतून परत जात असताना, रामपुर मनिहारान परिसरातील हायवेच्या जवळ दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीला लक्ष्य केले. चालत्या गाडीच्या खिडकीतून थेट शिवकुमारच्या डोक्यात गोळी मारण्यात आली, ज्यामुळे घटनास्थळीच एकच खळबळ उडाली आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले.
ADVERTISEMENT
हेही वाचा : सातारा : सरकारी अभियंत्याचा अपघात, 3 लाखांची सुपारी, बायकोचा कट
चार महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह, पण आता नवऱ्याचा गेम
या भीषण घटनेत शिवकुमारचा जागीच मृत्यू झाला. पत्नी आकांक्षाच्या म्हणण्यानुसार, तिचे आणि शिवकुमारचे चार महिन्यांपूर्वीच लव्ह मॅरेज झाले होते. या लग्नामुळे आकांक्षाचे माहेरचे लोक प्रचंड संतापलेले होते आणि तेव्हापासूनच ते या जोडप्याच्या जीवावर उठले होते. आकांक्षाने आपल्या कुटुंबावर गंभीर आरोप करताना सांगितले की, परीक्षेच्या ठिकाणी तिचे आई, भाऊ, बहीण, जीजा आणि मामा उपस्थित होते. तिचा भाऊ परमजीत याने जवळून गोळी झाडली, तर इतर नातेवाईकही तिथे हजर होते. गाडी अडवून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न झाला आणि यावेळी हल्लेखोरांनी आकांक्षालाही मारण्याची धमकी दिली होती, असे तिने रडत सांगितले.
हेही वाचा : Weather Report: महाराष्ट्रात मान्सून आला, पण अलर्ट मात्र भलत्याच गोष्टीचा.. नेमकं काय घडतंय?
शिवकुमारच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
या घटनेमुळे मृत शिवकुमारच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृताचा भाऊ शिवम कुमार याने आकांक्षाच्या कुटुंबीयांवर हत्येचा थेट आरोप केला असून, दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. या अत्यंत संवेदनशील प्रकरणाची दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. एसपी सिटी व्योम बिंदल यांनी दिलेल्या माहितीनुसार, फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून आवश्यक पुरावे गोळा केले आहेत आणि प्रत्यक्षदर्शींची कसून चौकशी केली जात आहे. पीडितेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.
पोलिसांनी सांगितले की, ही घटना कौटुंबिक वादातून घडल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न होत आहे. फरार आरोपींच्या अटकेसाठी विविध ठिकाणी छापे टाकले जात आहेत आणि लवकरच सर्व दोषींना अटक केली जाईल, असा दावा प्रशासनाने केला आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या हत्याकांडाने संपूर्ण परिसरात संतापाची लाट पसरली आहे. पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, आरोपींना लवकरात लवकर अटक करुन न्यायालयात उभे करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातून ही धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे.
ADVERTISEMENT











