UP Crime News : उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. नगला बधा गावातील 25 वर्षीय मनीष यादव या तरुणाची हत्या करण्यात आली असून, या प्रकरणाच्या पोलीस तपासानंतर संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (CRPF) एक जवान असून, त्याने 'ऑनर किलिंग'च्या नावाखाली ही निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे.
ADVERTISEMENT
नेमकी घटना काय?
मनीष यादव हा 18 फेब्रुवारी रोजी आपल्या घरातून कोचिंग क्लासला जातो असे सांगून बाहेर पडला होता, मात्र तो रात्री उशिरापर्यंत घरी परतलाच नाही. 20 फेब्रुवारीच्या सकाळी इकदिल पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेल्वे ट्रॅकजवळ एका गोणीत बंद असलेला त्याचा मृतदेह आढळून आला. ही घटना अपघाती वाटावी आणि पुरावे नष्ट व्हावेत, या उद्देशाने मृतदेह रेल्वे ट्रॅकवर फेकण्यात आला होता. मात्र, पोस्टमार्टम रिपोर्ट आणि डिजिटल एक्स-रे अहवालातून ही हत्या एका नियोजित कटाचा भाग असल्याचे स्पष्ट झाले.
हत्येचे कारण: प्रेमप्रकरण आणि संशय
पोलीस तपासात या हत्येमागे अभिषेक यादव नावाचा सीआरपीएफ जवान असल्याचे निष्पन्न झाले आहे. अभिषेकची बहीण उत्तर प्रदेश पोलीस दलात कार्यरत असून ती सध्या रामपूर येथे प्रशिक्षण घेत आहे. पोलीस माहितीनुसार, अभिषेकने मनीषला आपल्या बहिणीसोबत बोलताना आणि एकत्र फिरताना पाहिले होते. यावरून त्याच्या मनात रागाची भावना होती आणि त्याने मनीषचा काटा काढण्याचे ठरवले.
असा रचला हत्येचा कट
18 फेब्रुवारी रोजी अभिषेकने आपल्या दोन साथीदारांच्या (विपिन आणि दीपक) मदतीने मनीषला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गाडीत बसवले. त्यानंतर त्याला एका निर्जनस्थळी नेऊन त्याची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर पुरावे लपवण्यासाठी मृतदेह गोणीत भरून रेल्वे रुळावर फेकून दिला.
आरोपींची धरपकड
याप्रकरणी पोलिसांनी दीपक नावाच्या आरोपीला अटक केली आहे, ज्याने हत्येसाठी गाडी उपलब्ध करून दिली होती. त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. मात्र, मुख्य आरोपी सीआरपीएफ जवान अभिषेक यादव आणि त्याचा दुसरा साथीदार विपिन यादव हे सध्या फरार आहेत. पोलीस पथके त्यांचा शोध घेत आहेत. मयत मनीष यादव हा एक हुशार तरुण होता, त्याने नुकतीच ज्युनिअर असिस्टंटची परीक्षा उत्तीर्ण केली होती आणि तो सरकारी नोकरीच्या नियुक्ती पत्राची वाट पाहत होता.
ADVERTISEMENT











