Crime News Marathi : दहा महिन्यांपूर्वी देशभरात खळबळ उडवणाऱ्या एका अनोख्या प्रकरणाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. लग्नाच्या अवघ्या दहा दिवस आधी होणाऱ्या सासूसोबत पळून गेलेल्या जावयाची ही घटना होती. त्यानंतर दोघे परत आले आणि पोलिसांसमोर आम्ही एकमेकांवर प्रेम करतो व एकत्र राहू इच्छितो, असे जाहीर केले होते. आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला असून संबंधित महिलेने जावयालाही सोडून स्वतःच्या बहिणीच्या पतीसोबत पलायन केल्याचा आरोप आहे.
ADVERTISEMENT
राहुल नावाच्या व्यक्तीने वरिष्ठ पोलिस अधीक्षक (एसएसपी) कार्यालयात धाव घेत न्याय मागितला आहे. त्याचा दावा आहे की, गेल्या दहा महिन्यांपासून तो आणि अनिता नावाची महिला सीतामढी येथे पती-पत्नीप्रमाणे राहत होते. 6 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता तो नेहमीप्रमाणे कामासाठी बाहेर पडला. त्याच्या म्हणण्यानुसार, त्याच्या जाण्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात, म्हणजे सकाळी 9 वाजता अनिता ही तिच्या बहिणीचा पती देवेंद्रसोबत घरातून निघून गेली.
राहुलचा आरोप आहे की, अनीता दोन लाख रुपये रोख, एक सोन्याचे मंगळसूत्र आणि दोन अंगठ्या घेऊन पळून गेली. तसेच तिने त्याला फसवण्यासाठी तंत्र-मंत्र आणि अंधश्रद्धेचा आधार घेतल्याचा गंभीर आरोपही त्याने केला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, अनीताने त्याला तावीज घालायला भाग पाडले आणि मानसिकदृष्ट्या आपल्या प्रभावाखाली ठेवले. हा सगळा प्रकार आयुष्याची कमाई आणि मौल्यवान वस्तू हडप करण्यासाठी रचल्याचा दावा राहुलने केला आहे.
“माझी बुद्धीच फिरली होती. मी घरच्यांनाही विसरलो होतो. मला फक्त तीच दिसत होती,” असे राहुलने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. आता मात्र आपली चूक लक्षात आल्याचे तो सांगत आहे. 'तिच्यासाठी सगळ्यांना सोडलं, अन् आता तीच सोडून आणि लुटून गेली', असं म्हणत त्याने फसवणूक झाल्याचेही सांगितले.
दरम्यान, अनीता देवीनेही पोलिसांत राहुलविरोधात तक्रार दाखल केली आहे. तिने राहुलचे सर्व आरोप फेटाळून लावत उलट त्याच्यावरच गंभीर आरोप केले आहेत. अनीताच्या म्हणण्यानुसार, राहुलने तिला डांबून ठेवले होते. मारहाण केली आणि मुलगी विकण्याचा प्रयत्नही केला. तसेच तिचे साडेचार लाख रुपये आणि अर्धा किलो चांदी हडप केल्याचा आरोप तिने केला आहे. हे नाते आयुष्यातील सर्वात मोठी चूक असल्याचेही तिने म्हटले आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे पोलिसांसमोर गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही बाजूंनी परस्परांविरोधात तक्रारी देण्यात आल्या आहेत. पोलिसांनी सांगितले की, प्रेमसंबंध, आर्थिक वाद आणि छळाच्या आरोपांचा हा मिश्र प्रकार असून उपलब्ध पुरावे आणि जबाबांच्या आधारे निष्पक्ष तपास केला जाईल. पुढील कायदेशीर कारवाई तपासाअंती करण्यात येणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











