Crime News Marathi , बंगळुरू : प्रेमाच्या नावाखाली एका तरुणीचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा धक्कादायक प्रकार कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे उघडकीस आला आहे. कुटुंब, समाज आणि स्वतःचा धर्म त्यागून प्रेमासाठी सर्वस्व दिलेल्या एका हिंदू तरुणीला अखेर न्यायासाठी पोलिसांच्या दारात धाव घ्यावी लागत आहे. रीता (नाव बदललेले), जी धर्मांतरानंतर ‘सादिया तबस्सुम’ म्हणून ओळखली जाऊ लागली, हिने प्रेमाच्या नावाखाली फसवणूक, जबरदस्तीने धर्मांतर आणि नंतर परित्याग झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.
ADVERTISEMENT
ही घटना सन 2015 पासून सुरू झाली. डीजे हल्ली परिसरात राहणारी रीता ही कॉलेजमध्ये पीयूसीचे शिक्षण घेत असताना तिची ओळख परवेज या तरुणाशी झाली. ओळखीचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले. रीता सांगते की परवेजने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. मात्र, विवाहाचा विषय पुढे येताच तिच्या कुटुंबीयांनी धर्म वेगळा असल्याने या नात्याला तीव्र विरोध केला. अशा प्रकारची नाती भविष्यात टिकत नाहीत, असा कुटुंबीयांचा ठाम आक्षेप होता. त्या वेळी फरवेजने रीता आणि तिच्या कुटुंबीयांना विश्वास दिला की तो कधीही तिला धर्म बदलण्यास भाग पाडणार नाही. लग्नानंतरही ती हिंदू धर्मातच राहील, असे त्याने स्पष्ट आश्वासन दिले. या आश्वासनावर विश्वास ठेवत अखेर 15 डिसेंबर 2019 रोजी दोघांचा विवाह पार पडला.
हेही वाचा : अजितदादांच्या अंत्यसंस्कारादरम्यान 20 लाख रुपयांचे दागिने चोरीला, बारामती पोलिसांनी आवळल्या मुसक्या
मात्र, लग्नानंतर काही काळातच परवेजच्या वागण्यात मोठा बदल झाल्याचा आरोप पीडितेने केला आहे. रीता सांगते की तिच्यावर इस्लाम स्वीकारण्यासाठी मानसिक तसेच शारीरिक दबाव टाकण्यात येऊ लागला. धर्मांतर न केल्यास घटस्फोट देण्याची धमकीही दिली गेली. संसार वाचवण्यासाठी आणि नातं टिकवण्यासाठी अखेर रीता हिने इस्लाम स्वीकारला आणि तिचे नाव ‘सादिया तबस्सुम’ ठेवण्यात आले.
धर्मांतरानंतर सादियाने दोन मुलांना जन्म दिला. मात्र, तरीही तिच्या आयुष्यातील त्रास संपला नाही. आरोपानुसार, परवेजने कोणताही घटस्फोट न देता दुसऱ्या महिलेशी निकाह केला. याबाबत जाब विचारल्यावर सादियाला जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या तसेच तिला पूर्णपणे वाऱ्यावर सोडण्यात आले.
आपल्यावर अन्याय झाला असल्याचा आरोप करत सादियाने प्रथम डीजे हल्ली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, तेथून अपेक्षित मदत न मिळाल्याचा दावा तिने केला आहे. त्यामुळे आता तिने थेट बेंगळुरू पोलीस आयुक्त, डीजीपी आणि आयजीपी यांच्याकडे दाद मागितली आहे. प्रेमाच्या नावाखाली फसवणूक करण्यात आली असून, आता आपल्या दोन निष्पाप मुलांच्या भविष्यासाठी न्याय हवा आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया पीडितेने दिली आहे. या प्रकरणामुळे प्रेम, धर्मांतर आणि महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून, प्रशासनाकडून यावर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











