Crime News : सोशल मीडियावरील ओळख कशाप्रकारे एका भीषण हत्याकांडात बदलू शकते, याचं धक्कादायक उदाहरण समोर आलं आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर एका तरुणाने स्वतःला तरुणी असल्याचं भासवत दुसऱ्या तरुणाशी मैत्री केली. या ओळखीचं पुढे इतकं रूपांतर झालं की दोघे पती-पत्नीप्रमाणे एकत्र राहू लागले. मात्र, ज्याला तो तरुणी समजत होता, ती प्रत्यक्षात पुरुष असल्याचं समोर आल्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला आणि त्याच वादाचं पर्यवसान हत्येत झालं. या प्रकरणाचा उलगडा पोलिसांनी केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : 'तुम्ही पंतप्रधान किंवा मुख्यमंत्र्यांचे गुलाम नाहीत, जनतेचे सेवक आहात' हायकोर्टाने पोलिसांना फटकारले
पीयूषने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर संपूर्ण प्रकरणाचा उलगडा
25 जून रोजी रेल्वेच्या भिंतीलगत महिलांचे कपडे परिधान केलेल्या एका अज्ञात व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, फॉरेन्सिक शवविच्छेदन अहवालात डोक्यावर गंभीर स्वरूपाच्या जखमा असल्यामुळे हा खून असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि मानवी गुप्त माहितीच्या आधारे पोलिस उत्तर प्रदेशातील 20 वर्षीय पीयूष कुमार खरवारपर्यंत पोहोचले. चौकशीदरम्यान पीयूषने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.
हेही वाचा : अबब..! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या जळगावातील घरात 1.5 कोटींची रोकड, अर्धा किलो सोने...मोठं घबाड
चंदनला दाढी करताना पाहिल्यानंतर तो प्रत्यक्षात पुरुष असल्याचं समजलं
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हैद्राबादमध्ये राहत असताना पीयूषची फेसबुकवरील 'निशा कुमार' आणि इन्स्टाग्रामवरील 'पूनम' या आयडीद्वारे चंदन कुमारशी ओळख झाली होती. चंदनने स्वतःला तरुणी असल्याचं सांगत पीयूषचा विश्वास संपादन केला आणि दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली. तपासात असंही समोर आलं की, धार्मिक श्रद्धेचं कारण देत चंदनने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला होता. तरीही पीयूषने चंदनच्या कपाळात सिंदूर भरून पती-पत्नीप्रमाणे नातं स्वीकारलं. काही काळ दोघे एकत्र राहत होते. मात्र, एका दिवशी पीयूषने चंदनला दाढी करताना पाहिल्यानंतर तो प्रत्यक्षात पुरुष असून समलैंगिक संबंधांमध्ये रस असल्याचं त्याला समजलं. त्यानंतर दोघांमध्ये सातत्याने वाद सुरू झाले.
तपासादरम्यान आणखी एक बाब समोर आली की, पीयूष ज्या-ज्या ठिकाणी रोजगारासाठी जात होता, त्या-त्या ठिकाणी चंदनही त्याच्या मागे जात होता. हैदराबाद, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि अखेर राजकोट जिल्ह्यातील पडवला येथेही दोघांमधील वाद सुरूच होता. पोलिसांच्या माहितीनुसार, 21 जून रोजी पडवला येथील एका कारखान्यात पुन्हा दोघांमध्ये तीव्र वाद झाला. त्यानंतर पीयूष चंदनला रेल्वे रुळाजवळील निर्जन ठिकाणी घेऊन गेला आणि मोठ्या दगडांनी त्याच्या डोक्यावर तसेच शरीराच्या इतर भागांवर वार केले. गंभीर दुखापतीमुळे चंदनचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने मृतदेहावर दगड टाकून पुरावे लपवण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा कारखान्यात जाऊन नेहमीप्रमाणे काम सुरू केले, जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे पोलिसांनी या हत्येचा उलगडा केला. आरोपी पीयूष कुमार खरवार याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103 (1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
ADVERTISEMENT












