'तू मला का बोललास?' अल्पवयीन मुलाने अंगावर गाडी घालून चिरडले, पोलिसांनी कसे पकडले?

एखाद्याच्या मनात सूडाची भावना पेटल्यावर ती व्यक्ती कोणत्या थराला जाऊ शकते. हे सांगता येत नाही. अशीच एक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये एका अल्पवयीन मुलाने जुन्या वादाचा भयानक सूड उगवला.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 08:58 AM • 27 May 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

'तू मला का बोललास?'

point

अल्पवयीन मुलाने अंगावर गाडी घालून चिरडले

point

पोलिसांनी कसे पकडले?

Crime News : दिल्लीत एका 60 वर्षीय सुरक्षारक्षकाची जुन्या वादातून अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या खळबळजनक प्रकरणात दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन अल्पवयीन मुलांसह एकूण चार आरोपींना अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी सुरक्षारक्षक आणि एका अल्पवयीन मुलामध्ये जोरदार भांडण झाले होते, ज्यामध्ये रक्षकाने त्याला अपशब्द वापरले होते. याच अपमानाचा बदला घेण्यासाठी त्या अल्पवयीन मुलाने आपल्या मित्रांच्या मदतीने सुरक्षारक्षकाचा काटा काढण्याचा कट रचला. 24 मे रोजी सकाळी आरोपींनी आधी सुरक्षारक्षकाला धमकावून काठीने बेदम मारहाण केली आणि त्यानंतर त्याच्या अंगावर बोलेरो गाडी घालून त्याला चिरडले. त्याचा मृत्यू निश्चित करण्यासाठी आरोपींनी पुन्हा एकदा गाडी त्याच्या अंगावर चालवली.

हे वाचलं का?

बोलेरोची नंबर प्लेट काढून...

या अत्यंत क्रूर हत्याकांडानंतर आरोपींनी पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यांनी गुन्ह्यात वापरलेल्या महिंद्रा बोलेरो निओ गाडीची खरी नंबर प्लेट काढून टाकली, जेणेकरून त्यांची ओळख पटणार नाही. ही गाडी एका अल्पवयीन आरोपीच्या मामीच्या नावावर नोंदणीकृत असल्याचे तपासात उघड झाले आहे. या गुन्ह्याची उकल करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर तपास मोहीम हाती घेतली. पोलिसांनी आरोपींच्या पळण्याच्या मार्गावरील 200 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले, तसेच स्थानिक नागरिकांकडे चौकशी करून गुप्तहेरांना सक्रिय केले. यासोबतच तांत्रिक पाळत ठेवून (टेक्निकल सर्व्हिलन्स) पोलिसांचे पथक आरोपींच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवून होते.

हे ही वाचा : समजून घ्या: युतीचा इतिहास आणि 'ती' भळभळीत जखम, शिंदेंना का करावी लागते दिल्लीवारी?

सापळा रचून अटक

पोलिसांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना 25 मे रोजी मोठे यश आले. आरोपी काळ्या रंगाच्या त्याच बोलेरो गाडीतून हरिद्वारला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ परिसरात सापळा रचला आणि संशयित वाहन अडवून सर्व आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत सर्व आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये 22 वर्षीय विनय आणि 18 वर्षीय आयुष चव्हाण यांचा समावेश असून, इतर दोन आरोपी अल्पवयीन आहेत. विनय हा हरियाणातील बहादुरगडचा रहिवासी असून तो बीसीए द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे, तर आयुष दिल्लीच्या नजफगड परिसरातील रहिवासी आहे.

हे ही वाचा : महाराष्ट्र आता थांबणार नाही! मंत्रिमंडळ बैठकीतील 4 धडाकेबाज निर्णय

यापूर्वीही गंभीर गुन्हे

पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा बोलेरो गाडी आणि काठी जप्त केली आहे. तपासादरम्यान पोलिसांना आणखी एक महत्त्वाची माहिती मिळाली असून, आरोपी विनय आणि एक अल्पवयीन मुलगा यापूर्वीही हरियाणातील बहादुरगड येथे अशाच प्रकारच्या गंभीर गुन्ह्यात सामील होते. सध्या पोलीस त्यांच्या या जुन्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा कसून तपास करत आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास दिल्ली पोलिसांकडून अत्यंत गांभीर्याने सुरू असून, आरोपींना कडक शिक्षा मिळवून देण्यासाठी ठोस पुरावे गोळा केले जात आहेत.