Crime News : नदीच्या वाळूत पुरलेल्या अवस्थेत आढळलेल्या अज्ञात महिलेच्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. या खळबळजनक हत्याकांडात प्रेमसंबंध, लग्नाचा दबाव, सामूहिक बलात्कार आणि हत्येचा धक्कादायक कट समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले साहित्यही जप्त केले आहे. 6 जून रोजी सफी नदीच्या पात्रात वाळूखाली लपवून ठेवलेला महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता. या तपासात फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या पथकाचीही मदत घेण्यात आली. झारखंडमधील चतरा येथील हे प्रकरण आहे.
ADVERTISEMENT
यात्रेला जाते म्हणून बाहेर पडली अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, फॉरेन्सिक पथकाकडून मिळालेले सुगावे आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे मृत महिलेची ओळख पटवण्यात आली. ती महिला रांची जिल्ह्यातील रातू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राहणारी होती. तपासात समोर आले की, ती 1 जून रोजी घरातून यात्रेला जात असल्याचे सांगून बाहेर पडली होती. तिच्या मोबाईल कॉल्स आणि संपर्कांचा तपास केला असता, रांची जिल्ह्यातील खलारी परिसरातील सुरज कुमार याच्यासोबत तिचे प्रेमसंबंध असल्याचे उघड झाले. महिला सुरजवर लग्नासाठी सातत्याने दबाव टाकत होती आणि लग्न न केल्यास कायदेशीर कारवाईची धमकीही देत होती.
हे ही वाचा : महिला डॉक्टरचा मृतदेह आढळला; पतीवर विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप
सामूहिक बलात्कार अन् हत्या
याच लग्नाच्या दबावाला कंटाळून सुरज कुमारने आपल्या मित्रांच्या मदतीने महिलेच्या हत्येचा कट रचला. योजनेनुसार, 1 आणि 2 जूनच्या मध्यरात्री महिलेला मांडा जत्रा फिरवण्याच्या आणि लग्नाबाबत चर्चा करण्याच्या बहाण्याने पंडरियाच्या जंगलात बोलावण्यात आले. तिथे आधीच दबा धरून बसलेल्या सुरजच्या साथीदारांनी म्हणजेच राहुल भुईया आणि रोहित कुमार महतो यांनी जंगलात महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर आरोपींनी चाकू आणि विटांनी वार करून तिची निर्घृण हत्या केली. हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी आणि कोणाला संशय येऊ नये म्हणून त्यांनी मृतदेह सफी नदीच्या किनाऱ्यावर नेऊन वाळूत पुरून टाकला.
हे ही वाचा : भाजपशी लढायचे असेल तर विरोधी पक्षांकडे आता हा 'एकच' पर्याय
चौघांना अटक
पोलिसांनी तांत्रिक आणि वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे तपास चक्रावून या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार सुरज कुमार (19), पवन महतो (21), राहुल भुईया (19) आणि रोहित कुमार महतो (19) या चारही आरोपींना अटक केली आहे. हे सर्व आरोपी रांची जिल्ह्यातील मनातू गावचे रहिवासी आहेत. अटक केलेल्या आरोपींच्या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळावरून मृत महिलेची चप्पल, हत्येसाठी वापरलेला चाकू, वीट आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त केली आहे. हे सर्व पुरावे पुढील फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले असून पोलीस या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.
ADVERTISEMENT











